प्रतिनिधी/ चिपळूण
काही दिवसांपूर्वी तालुक्यात प्रतिष्ठापना झालेल्या गणरायांपैकी 6 दिवसांच्या 24 हजार 395 गणराय व 3 हजार 144 गौरींना 27 ऑगस्ट रोजी निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शहरात नगर परिषदेचे 4 फिरते कृत्रिम तलाव सज्ज झाले आहेत.
मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यावर्षी साध्या पण उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे 27 रोजी होणाऱया 6 दिवसांच्या गणपती विसर्जनाची तयारी भक्तांनी केली आहे. गुरूवारी चिपळूण पोलीस स्थानक विभागातील 9 हजार 772 घरगुती, वेसमारूती या एका सार्वजनिक, 1 हजार 244 गौरी, अलोंरे विभागातील 5 हजार 300 घरगुती, 650 गौरी, सावर्डे विभागातील 9 हजार 322 घरगुती, 1 हजार 250 गौंरीना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. या तिन्ही विभागातील मिळून 5 हजार 300 घरगुती, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, नगर परिषद, रेल्वे, पोलीस स्थानक या सहा सार्वजनिक गणरायांनाही यापूर्वी दीड दिवसांनी निरोप देण्यात आला आहे.
कोरोनामुळे बाजारपूल, बहाद्दूरशेखनाका, रामतीर्थ, गांधारेश्वर, मिरजोळी, कापसाळ, कळंबस्ते आदी ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार नगर परिषदेने 4 फिरते कृत्रिम तलाव, तर विविध भागातून गणरायाच्या मूर्ती आणण्यासाठी दहा अन्य सजवलेल्या वाहनांची व्यवस्था केली आहे. दीड दिवसाच्या शेकडो गणरायांचे या तलावांमध्ये विसर्जन करून भक्तांनी शासनाच्या उपक्रमाला पसंती दिली होती. त्यामुळे गुरूवारीही असेच सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे. या व्यवस्थेबरोबरच काही विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नगर परिषदेने विजेची व्यवस्था केली आहे.