प्रतिनिधी/ चिपळूण
देशाच्या पश्चिम समुद्रात वादळाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असल्याने जिल्हय़ाच्या सुरक्षिततेसाठी पुणे येथून एनडीआरएफची एक तुकडी येथे सोमवारी दाखल झाली आहे. सर्व यंत्रसामुग्रीसह 26 जवान येथे दाखल झाले आहेत. जिल्हय़ाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर या दरम्यान आपत्ती आल्यास त्याला सामोरे जाता यावे यासाठी शासनाने ही तुकडी येथे पाठवली आहे. जिल्हयांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळुणात या तुकडीला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या तुकडीचे सोमवारी सकाळी येथे आगमन झाले. एसटी बसमधून 26 जवान प्रमुखांसह येथे आले आहेत. एक टेम्पो यंत्रसामुग्री त्यांच्यासोबत आहे.
प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी उमेश गिज्जेवार यांनी माटे सभागृहात त्यांची सर्व व्यवस्था केली आहे. या तुकडीचे प्रमुख राजू यादव हे सोमवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या भेटीला रत्नागिरीत गेले होते. तेथे मिश्रा यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हय़ाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व परिस्थितीवर ही तुकडी लक्ष ठेऊन राहणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे0 कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.