42 गावांतील 111 शेतकऱयांचे साडेचौदा हेक्टर बाधित, नुकसानीचे पंचनामे सुरूच
वार्ताहर/ चिपळूण
कोकण किनारपट्टीवर हाहाकार माजवलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील शंभरहून अधिक गावांना तडाखा बसला. या वादळात घरे, गोठय़ांची कौले व छप्परे उडून तसेच झाडे आणि फांद्या पडल्याने लाखोंची हानी झाली आहे. याशिवाय 42 गावांतील 111 शेतकऱयांच्या 14.21 हेक्टर क्षेत्रालाही या वादळाचा जोरदार फटका बसला.
बुधवारी सकाळपासून झालेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामध्ये तालुक्यात अतोनात नुकसान झाले. महसूल विभागामार्फत शुक्रवारपर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये शंभरहून अधिक घरे, गोठय़ांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बहुतांशी नुकसान हे घरांवर झाडे व फांद्या पडल्यामुळे झाले आहे. संबंधित गावांतील तलाठय़ांमार्फत अजूनही पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा अधिकृत आकडा समजू शकला नाही.
या वादळाचा जोरदार फटका शेतकरी व बागायतदारांनाही बसला आहे. तालुक्यातील मुंढे, कासारवाडी, मुर्तवडे, तळसर, शिरगांव, पिंपळी बुद्रूक, अलोरे, पेढांबे, नागावे, कोळकेवाडी, कळकवणे, कुंभार्ली, रेहेळ भागाडी, वैजी, मिरजोळी, कोंडमळा, सावर्डे, वहाळ, टेरव, चिवेली, गाणे, कुटरे, नायशी, तोंडली, दहिवली, ढोक्रवली, नारदखेरकी आदी 42 गावांतील 111 शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू, नारळ, केळी आदीं झाडे वादळामध्ये जमीनदोस्त झाली आहेत. या वादळामध्ये 42 गावांमध्ये 14.21 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये आंबा पिकाचे 7.16 हेक्टर क्षेत्र, काजू पिकाचे 1.21 हेक्टर क्षेत्र, नारळ पिकाचे 0.04 हेक्टर क्षेत्र, तर केळीच्या 5 हेक्टर क्षेत्राचा त्यात समावेश आहे. अजूनही या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू आहेत. दरम्यान, लवकरात लवकर ते पूर्ण करून नुकसानीचा अहवाल द्यावा, असा पत्रव्यवहार महसूल विभागाने तालुका कृषी विभागाकडे केला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील हापूस आंब्यालादेखील या वादळाचा मोठा फटका बसला. ऐन विक्रीच्या हंगामातच लागलेली आंब्याची कलमे उन्मळून पडली. वादळात आंबे गळून पडल्याने आंबा बागायतदार व व्यापाऱयांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. दोन महिन्यांत अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखोंचे नुकसान केले होते. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने या बागायतदारांचे कंबरडे मोडले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.