प्रतिनिधी/ चिपळूण
बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेले महापुराचे थैमान शुक्रवारी पहाटे शमले. पूर ओसरून चार दिवस उलटले तरी मुख्य बाजारपेठेसह शहरात ना साफसफाई सुरू झाली, ना त्यादृष्टीने मदतकार्य. रस्ते अजूनही प्रचंड चिखलाने माखलेले आहेत. जागोजागी कचऱयाचे ढीग आहेत. पूरग्रस्त व्यापाऱयांनी शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता स्वतःच साफसफाईत झोकून घेतले आहे. या आपत्तीत जिल्हय़ाची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आहे कोठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खासदार, मंत्र्यांनी आढावा घेऊन केलेले नियोजन अजूनही कागदावरून खाली उतरलेले दिसत नाही.
चिपळूण परिसरावर जुलै 2005च्या महापुरापेक्षाही भयानक महापुराचे संकट ओढवले आहे. मोठय़ा आर्थिक आणि जीवितहानीला या नगरीला सामोरे जावे लागले आहे. काडीकाडी जमा करून उभा केलेला संसार, वर्षानुवर्षाच्या मेहनतीने सुरू केलेला व्यापार या महापुरात उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे पुरते कोलमडून गेलेले व्यापारी, पूरग्रस्त शासकीय मदतीकडे डोळे लावून बसलेले असताना 5 दिवसांनंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. उलट आपली गळणारी आसवे पुसत सारे स्वतःच पुढे सरसावले आहेत.
शुक्रवारी पूर ओसरल्यानंतरही चार दिवस उलटले तरी मदतकार्याच्या दृष्टीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी कोणतीही पावले उचललेली नाहीत. चिपळुणात परिसरात चिखलाचे साम्राज्य आहे. चिखलाबरोबर शेकडो टन कचरा प्रत्येक अपार्टमेंट आणि घराच्या बाहेर जमा झाला आहे. हे साफ करायला माणसेही कमी पडत आहेत. नगर परिषदेकडून कचरा साफ केला जात असला तरी ती यंत्रणाही कमी पडत आहे.
जिह्यातील अनेक सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी स्वतःहून मदतीचा हात दिला आहे. बाहेरील तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि पूरग्रस्तांचे नातेवाईक साफसफाईच्या मदतकार्यत उतरले आहेत. मात्र यामध्ये शासकीय यंत्रणा कुठेच दिसत नाही. अजूनही मुख्य बाजारपेठ आणि शहरातील गल्लीबोळात चिखलामुळे रस्त्यावरून चालताही येत नाही. दुकानांच्या बाहेर कचऱयाचे ढीग आहेत. शहरातील मोकळ्या भागात, इमारतींच्या आवारात पुरात आलेला कचरा अडकून पडला आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
मुळातच नैसर्गिक आपत्तीवेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यरत असते. मात्र गेल्या पाच दिवसांत या यंत्रणेचे कोणतेच अस्तित्व दिसून आले नाही. मदतकार्यासाठीचे कोणतेही नियोजन नाही. प्रशासन जाहीर करत असलेली माहिती आणि प्रत्यक्षातील स्थिती यामध्ये मोठा फरक आहे. जिल्हाधिकाऱयांसह वरिष्ठ अधिकारी महापूर ओसरल्यानंतर रत्नागिरीत निघून गेले ते रविवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱयासाठी आले. स्थानिक प्रशासनातील अधिकारी तर स्वतः या पुरात अडकलेले आहेत. त्यांनाही पुराचा फटका बसलेला आहे. अशा परिस्थितीत उपाययोजनांचे मात्र तीनतेरा वाजले आहेत
पूर ओसरल्यानन्तर तीन दिवसांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी वरिष्ठ अधिकाऱयांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीलाही अनेक वरिष्ठ अधिकाऱयांनी दांडी मारून आपल्या निष्ठेचे दर्शन घडवले. याच बैठकीत स्वच्छता आणि वैद्यकीय मदतीबाबत नियोजन केले. मात्र तीन दिवसांनंतरही ते कागदावरच राहिले आहे. त्यामुळे मंत्री आणि खासदार यांचा प्रशासनावर कोणताच वचक राहिलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.