प्रतिनिधी/ चिपळूण
एकीकडे पाण्याविना नागरिकांचे हाल होत असतानाच दुसरीकडे यावरून राजकारण रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चार दिवसांनी काही अंशी पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी त्यातील अडचणी कायम आहेत. त्यामुळे या अडचणी सोडवण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खेर्डी येथील पंपहाऊस अर्ध्या शहराची तहान भागवतो. येथे दोन पंप असून त्यातील एका पंपाच्या माध्यमातून काही भागाला, तर दुसऱया पंपाच्या माध्यमातून अन्य भागाला पाणी पुरवठा केला जातो. यातील खेंड, पाग आदी भागाला पाणी पुरवठा करणारा पंप चार दिवस बंद पडला होता. त्यामुळे ऐन रमजान महिन्यात नागरिकांना पाणी मिळणे कठीण बनले होते. यावर उपाय म्हणून प्रशासन काही भागाला टँकरने पाणी देत होते. असे असताना कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून घरी बसलेल्या अनेक राजकारण्यांना 2 दिवस याचा थांगपत्ताच नव्हता. अनेकजण नागरिकांचे दूरध्वनीही उचलत नव्हते. मात्र ओरड जोरात सुरू झाल्याने लोकप्रतिनिधींना जाग आली आहे.
यातूनच काही नगरसेवकांनी हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा दिला, तर काहींनी या प्रकाराला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र अनेक नगरसेवकांनी यात जास्त लक्ष घालण्याची जबाबदारी नगराध्यक्षांची असल्याचे नमूद केले आहे. यावर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी, मी तातडीने यात लक्ष घालून पंपाची दुरूस्ती करून घेत पाणी पुरवठा सुरळीत केल्याचे सांगितले आहे. तर महाविकास आघाडीच्या पाणी सभापती फैरोजा मोडक यांनी, यात आपण लक्ष घालून काम मार्गी लावले असून पाणी पुरवठा सुरू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत, असा सल्ला आपल्याच गटातील नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे एकंदरीत पाणी प्रश्नावरून राजकारण रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पाणी पुरवठा सुरू, अडचणी कायम
चार दिवसांनी पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी त्यातील अडचणी मात्र कायम आहेत. पाणी पुरवठा सुरू झाल्यावर डीबीजे महाविद्यालय परिसरात असलेल्या व्हॉल्ववरील चकती तुटल्याने मार्कंडी, काविळतळी, ओझरवाडी आदी परिसरात मंगळवारी सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. या चकतीची दुरूस्ती उशिरापर्यत सुरू होती. त्यामुळे आता दुसऱया भागालाही पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.
मुख्य बाबींकडे सर्वांचेच दुर्लक्ष
मुळातच खेर्डी हे मुख्य पंपहाऊस आहे. येथे दोन नियमित चालणाऱया पंपाबरोबरच एक राखीव पंपही आहे. मात्र पाणी विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या 6 महिन्यापासून तो नादुरूस्त आहे. कदाचित त्याची वेळेत दुरूस्ती झाली असती तर नागरिकांना पाण्याविना रहावे लागले नसते. त्यामुळे यात हलगर्जीपणा कोणाचा हे शोधण्याऐवजी राजकारणी आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
.