प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील काविळतळी परिसरातील ऑर्चिड इमारतीमधील शेवटच्या मजल्यावर असलेल्या सदनिकेला मंगळवारी रात्री 11.45 वाजता अचानक भीषण आग लागली. 15 मिनटात आगीने रौद्ररूप धारण केले. तरीही काही नागरिक व नगर परिषदेच्या कर्मचाऱयांनी आपला जीव धोक्यात घालून दोन सिलिडरपर्यंत आग पोचू दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच या सर्वांनी तिघांचा जीवही वाचवला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या सदनिकेत अनप नावाचे कुटुंब भाडय़ाने राहते. त्यात पती, पत्नी व 12 वर्षाचा मुलग्याचा समावेश आहे. मंगळवारी रात्री 11.30 वाजता या सदनिकेतून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र काही कळायच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे सदनिकेचा हॉल व्यापला गेला. मात्र बेडरूमध्ये तिघेजण अडकले होते. त्यांना बाहेर पडताच येत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी टेरेसवर असलेल्या टाकीतून पाणी घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच नगर परिषदेचा बंबही आला. अखेर सर्वांच्या प्रयत्नातून आण आटोक्यात आणण्यात यश आले.
त्यानंतर लोखंडी व दुसरा दरवाजा तोडून आत अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच किचनमध्ये असलेल्या दोन सिलिंडरपर्यंत आग जाऊ नये म्हणून हॉलमध्येच आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न झाल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे अभय गांधी, मनोज फरांदे, संजय पवार, अमोल वीर, प्रतिक घेवडेकर, हर्ष कांबळी, सौरभ मोहिते, देवदास गावडे, प्रमोद अभ्यंकर, नातू, गुरव, गौरव गांधी, कौशल गांधी, सुधीर गांगण, भरत शिरगावकर, निरंजन रेडीज, मंगेश बहादूरे आदींनी प्रयत्न केले.