चिपळूण
तालुक्यातील मालदोली मोहल्ला येथे गुरुवारी अचानकपणे लागलेल्या आगीमुळे पाळीव जनावराचा गेठा पूर्णतः जळून खाक झाला. या आगीत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली तर उर्वरित 13 जनावरे होरपळली. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप पुढे आलेले नाही. यात तब्बल 2 लाख 60 हजाराचे नुकसान झाले आहे.
अजिज तांबे (मालदोली मोहल्ला) यांच्या मालकीचा हा गोठा आहे. तांबे हे शेतकरी असून दुग्ध व्यवसायावर ते उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्या मालकीच्या गोठय़ाला अचानकपणे आग लागली. भरउन्हात ही आग लागल्याने काही कळायच्या तिने रौद्ररूप धारण केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला होता. या गोठय़ामध्ये एकूण 15 जनावरे बांधून ठेवण्यात आली होती. आग लागल्यानंतर अनेक जनावरांनी दावी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर काही जनावरे या आगीत सापडल्याने ती भाजली आहेत. अधिक भाजलेली एक म्हैस व एका रेडकाचा यात मृत्यू झाला आहे. या आगीतून दावी तोडून पळालेली काही जनावरे लांबवर गेली होती. त्यांना शुक्रवारी शोधून काढण्यात आले.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून तब्बल 2 लाख 60 हजाराचे यात नुकसान झाले आहे. तसेच 20 हजाराचा पेंढाही जळून खाक झाला आहे. यावेळी तलाठी उमेश राजेशिर्के, पोलीस पाटील गोविंद माळी यांनी या घटनेचा पंचनामा केला असून तो तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.