वार्ताहर/ चिपळूण
तालुक्यात अडकलेल्या झारखंडमधील मजुरांना स्वगृही पाठवल्यानंतर येथील प्रशासनाने रविवारी बिहार व कर्नाटकातील साडेसातशेहून अधिक प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या राज्यात रवाना केले. प्रशासनाने या मजुरांच्या जेवण-नाष्टय़ाची उत्तम व्यवस्था केल्याने या मजुरांनी अधिकारी व कर्मचाऱयांचे आभार मानले.
काही दिवसांपूर्वी तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणाऱया झारखंडमधील शेकडो मजुरांना येथील मध्यवर्ती बसस्थानकातून पनवेलला नेण्यात आले होते. तेथून रेल्वेने त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. तशाच स्वरूपाचे नियोजन करून रविवारी पहाटे बिहारमधील 450 मजुरांना 19 एस. टी. बसेसने रत्नागिरी रेल्वेस्थानकात सोडण्यात आले. यासाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ व त्यांचे महसूलचे सर्व सहकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र, आरोग्य, चिपळूण आगारातील कर्मचारी रात्रभर मध्यवर्ती बसस्थानकात तळ ठोकून होते. रत्नागिरी तेथून ते मजूर रविवारी सकाळी आपल्या राज्यात रवाना झाले.
येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटकला जाणाऱया मजुरांनी सकाळपासूनच हजेरी लावण्यास सुरूवात केली. पत्नी, मुलाबाळांसह त्यांनी संसाराचे अन्य साहित्यही सोबत आणले होते. गावाला जायला मिळत असल्याने सर्वांच्याच चेहऱयावर आनंद व समाधान दिसून येत होते. प्रशासनामार्फत या मजुरांना दुपारी शहरातील मोफत झुणका-भाकर केंद्रावर नेऊन जेवण देण्यात आले. मजुरांची नोंदणी केल्यानंतर त्यांना वालोपे रेल्वे स्थानकात एसटी बसेसने सोडण्यात आले. तेथून सायंकाळी 6 वाजता कर्नाटकमध्ये जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात आली.
खेडमधून 260 मजूर कर्नाटकला रवाना
खेड
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी येथील प्रशासनाने एस.टी. बसची व्यवस्था केली आहे. यानुसार रविवारी येथील बसस्थानकातून चिपळूण रेल्वे स्थानकापर्यंत 12 एस.टी. बसेस सोडण्यात आल्या. तालुक्यात अडकलेले 260 मजूर कर्नाटकला रवाना झाले.
येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात मजुरांची नोंदणी केल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतरच या मजुरांना बसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. महाडनाका येथील गोळीबार मैदानातून चिपळूणच्या दिशेने एस.टी. बसेस मार्गस्थ झाल्या. दरम्यान, कशेडी चेकपोस्टवर येथील बसस्थानकातून 5 एस.टी. बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. या बसमधून मुंबई व पुणेतून येणाऱया चाकरमान्यांना लवेल येथे संस्थात्मक कक्षात विलगीकरण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.