जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतच राहणार सुरू
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण बाजारपेठ पूर्वीप्रमाणेच बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱयांनाही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. नियम मोडल्यास कारवाई केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या भीतीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. आता शासन त्यात थोडी सूट देत आहे. नेमकी सूट काय आहे, याचा विचार न करता काही व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे सोमवारी काही दुकाने उघडली गेल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ग्राहकांच्या गर्दीबरोबरच वाहनांच्या लांबसडक रांगा पहायला मिळाल्या. यामुळे जिल्हाधिकरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासोबत झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सनंतर प्रांताधिकारी पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ वैभव विधाते यांनी बाजारपेठ पूर्वीप्रमाणेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तशा सूचना रिक्षाद्वारे सायंकाळी बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांना देण्यात आल्या. तरीही काही दुकानदार मंगळवारी सकाळी दुकाने उघडण्याच्या तयारीत आले होते. मात्र पोलीस व नगर परिषदेची पथके शहरात गस्त घालत असल्याने कोणीही दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे दीड महिन्यानंतर कामावर आलेले कर्मचारी माघारी गेले. काही फुलविक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. तसेच काही पुस्तकांची दुकानेही उघडी दिसल्याने तेथे ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. मात्र दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
घाटमाथ्यावरून होणाऱया भाजी अन्य वस्तूंच्या वाहतुकीवरील बंदी आता उठली आहे. त्यामुळे भाजी, कांदा, बटाटा याची काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारपेठत भाजी उपलब्ध झाली असून ती खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहरातील भाजीमंडई परिसर सील करण्यात आला असल्याने येथील व्यावसायिकांनी अन्य भागात आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे गर्दी वाढतानाचे चित्र पहायला मिळत आहे.