प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठीसह उपनद्यातील गाळ उपशाबाबत येथील प्रांत कार्यालासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ बुधवारी चिपळूण बंदची हाक दिल्यानंतर त्याला शासकीय कार्यालये वगळता 100 टक्के प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंदमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत तसेच गल्लीबोळातील रस्तेही निर्मनुष्य बनले होते. दरम्यान, सतराव्या दिवशीही उपोषण सुरूच असून बुधवारी हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव, शेखर निकम यांनी चिपळूणच्या गाळासंदर्भात प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले.
गाळासंदर्भात सरकारकडून ठोस आश्वासन दिले न गेल्याने चिपळूण बचाव समितीने गेल्या 17 दिवसांपासून आरंभलेल्या साखळी उपोषण्नादरम्यान भीक मांगो आंदोलन, निषेध मूकमोर्चानंतर बुधवारी चिपळूण बंदची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी शहरातीलच नव्हे तर अगदी कोंढे ते शिरगांव पोफळीपर्यंत दुकाने बंद ठेवत व्यापाऱयांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. रिक्षा, वडाप संघटनांनीही पाठिंबा दर्शवल्याने शहर, परिसरातील एकही रिक्षा रस्त्यावर धावली नाही. सर्व रिक्षा थांबे ओस पडले होते. शहरातील नेहमीची वर्दळीची ठिकाणे असलेली मुख्य बाजारपेठ, भाजीमंडई, जुना बसस्थानक परिसर, चिंचनाका, भोगाळे मार्ग, मार्कडी, बहाद्दूरशेख ते खेर्डीपर्यंत एकही दुकान उघडण्यात आले नव्हते. पुढे चिंचघरी, पिंपळी, अलोरे, शिरगांवमध्येही बंद पाळण्यात आला. लाईफ केअर रुग्णालयासह अनेक रुग्णालयांनीही बंदमध्ये सहभाग दर्शवत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली होती.
चिपळूण बंदमध्ये केमिस्ट असोसिएशनही सहभागी झाली होती. गरजूंची गैरसोय होऊ नये म्हणून तालुक्यातील सर्व औषध दुकाने दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. तसेच या काळात कुठलाही अपघात अथवा इतर कारणासाठी तत्काळ औषधे लागल्यास संघटना पदाधिकाऱयांनी आपले संपर्क क्रमांक जाहीर करून संपर्क साधण्याचे आवाहन केल्याने गरजूंना त्याचा फायदा झाला.
चिपळूणच्या इतिहासातील प्रथमच कडकडीत बंद
चिपळुणात आजपर्यंत अनेक राजकीय पक्ष, व्यापाऱयांसह विविध संघटनांनी चिपळूण बंदचे आवाहन अनेकवेळा केले. त्यामध्ये बंदला प्रतिसादही मिळाला. मात्र बुधवारी कडकडीत बंदला मिळालेला 100 टक्के प्रतिसाद हा अलीकडच्या काळातील पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात मिळाला आहे. जनतेसह व्यापारी, औषध दुकाने, रुग्णालयांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे शहरासह तालुक्यातीलही गावागावातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे चिपळूणच्या इतिहासातील कडकडीत बंद म्हणून बुधवारच्या बंदकडे पाहिले जाणार आहे.
उपोषण सुरूच
बुधवारी सतराव्या दिवशीही समितीने आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. कडकडीत बंदमुळे सकाळच्या सत्रात उपोषणस्थळी मोठी गर्दी झाली होती. सरकारविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत होता.
निकम, जाधवांनी वेधले लक्ष
राज्याचे हिवाळी अधिवेशन बुधवारी सुरू झाल्यानंतर बुधवारी पहिल्याच दिवशी आमदार जाधव, आमदार शेखर निकम यांनी चिपळूणचा पूर, गाळाचा प्रश्न आणि उपाययोजना यावर सरकारचे लक्ष वेधले. आमदार निकम यांनी सुरू असलेल्या उपोषणावरून जनतेच्या भावना तीव्रपणे मांडल्या.