भगवान श्रीकृष्णाशी अठ्ठावीस दिवसरात्र अविश्रांत द्वंद्वयुद्ध खेळणारा जांबवंत बलवान निश्चितच होता. हाच जांबवंत राम अवतारात वानर सेनेचा एक प्रमुख नायक होता. त्याचे पूर्व चरित्र काय? काही पुराणात ब्रह्मदेवाच्या जांभईतून जांबवंताचा जन्म झाला असा उल्लेख मिळतो. तर काही पुराणात प्रजापति व रक्षा यांचा हा पुत्र होता असा उल्लेख मिळतो. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृप आणि परशुराम हे सात जण चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत. याखेरीज वसि÷, अत्रि, विश्वामित्र, दुर्वास, मार्कंडेय, जांबवंत हेही चिरंजीव मानले जातात. कृष्णावतारातील स्यमंतकमणी कथा ही द्वापारयुगातील आहे. याप्रसंगी जांबवंत उपस्थित आहेत. त्यापूर्वी राम अवतार म्हणजे त्रेतायुगात जांबवंत उपस्थित आहेत. वानर सेनेचे ते एक नायक आहेत. रावण वधानंतर रामप्रभूच्या विजयाचा नगारा यांनीच वाजविला. रामराज्याभिषेकासाठी समुद्राचे पाणी यांनीच आणले. रामाच्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी यज्ञाच्या अश्वाच्या संरक्षणासाठी शत्रुघ्नबरोबर जांबवंतही यात्रा करतात. जांबवंतांचा जन्म यापूर्वीच्या सत्ययुगात झाला. वामन अवताराच्या वेळीही हे उपस्थित आहेत. वामनाला त्यांनी प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख पुराणात सापडतो. म्हणजेच जांबवंत हे हनुमान व परशुराम यांच्यापेक्षा वयाने ज्ये÷ आहेत. तर बलीराजा हे जांबवंतापेक्षा वयाने ज्ये÷ आहेत. ते अत्यंत बुद्धिमान असून वेद शास्त्र ज्ञान संपन्न आहेत. तसेच अत्यंत बलवान आहेत. त्यांचा देह मात्र ऋक्ष म्हणजेच अस्वलाचा आहे. त्यांचा उल्लेख ऋक्षराज असा अनेक पुराणात केला आहे.
अशा या जांबवंताला जेव्हा अठ्ठावीस दिवसांच्या द्वंद्वयुद्धानंतर खात्री पटली की आपल्याशी युद्ध करणारा दुसरा तिसरा कुणीही नसून आपला स्वामी रामच आज कृष्ण अवतारात समोर आला आहे तेव्हा ते श्रीकृष्णाला शरण आला. जांबवंत श्रीकृष्णाला पुढे म्हणाले-हे माझ्या प्रभू रामचंद्रा! या दासाचे कल्याण करण्यासाठीच आपण आज माझ्यासमोर कृष्ण रुपात प्रकट झाला आहात. मी आपल्याला ओळखले आहे व आपणाला शरण आलो आहे. आपल्या नामनौकेत बसून आजही पामर पापीही भवसागर तरून जातात असे वर्णन श्रुति व पुराणांनी केले आहे तो भगवंता तूच आहेस. या दासाचे अपराध क्षमा कर. असे म्हणून जांबवंताने श्रीकृष्णाचे पाय धरले. त्या करुणाकर प्रभूने प्रेमाने जांबवंताला हाताला धरून उठवले व त्याला दृढ आलिंगन दिले. जांबवंताने प्रभूला नम्रतापूर्वक विचारले-हे देवा! आपले या दासाच्या विवरात कोणत्या कारणाने आगमन झाले? त्यावर श्रीकृष्ण काय म्हणाले पहा,
श्रीकृष्ण म्हणे गा ऋक्षपाळा । आम्ही पातलों या तव बिळा । द्वारिं टाकूनि जनपदमेळा । माजी एकला मी आलों । किमर्थ आलों म्हणसी जरी । तरी या मणीची माझिया शिरिं । सत्राजितें घातली चोरी । लोकोत्तरिं हा अभिशाप । मिथ्याभिशापप्रक्षालना। करितां मणीची गवेषणा । प्राप्त झालों तुझिया स्थाना । मणिग्रहणा प्रवर्तलों । आतां याचि मणीकरून । मिथ्याभिशापप्रक्षालन । करावयाचें मज कारण । इतुकें श्रीकृष्ण त्या वदला ।