ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन २१ व्या दिवशीही कायम आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात यासंदर्भात अनेक बैठका झाल्या. सरकार काही दुरुस्त्या करण्यास तयार आहे. तर नवे कृषी कायदे रद्द करण्याचा मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी आज दिल्ली-नोएडाला जोडणाऱ्या चिल्ला बॉर्डरवर ‘चक्का जाम’ केला आहे.
चिल्ला बॉर्डरवर शेतकऱ्यांची सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू आहे. शेतकरी रस्त्यात लाठ्या-काठ्या घेऊन बसले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याची सूचना
दिल्लीलगतच्या सिंघू, टिकारी आणि गाझीपूरच्या सीमेवर शेतकरी दोन आठवडे उभे ठाकले आहेत. त्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिंगू, औचंदी, प्याऊ मनियारी, साबोली सीमा बंद असून, लोकांना लामपूर, साफियाबाद आणि सिंघू स्कूल टोल टॅक्स बॉर्डरमार्गे पर्यायी मार्गाने जाण्यास सांगण्यात आले आहे.