ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील पाच दिवसात चीनकडून महाराष्ट्रात 40,300 सायबर हल्ले झाले आहेत. विशेष आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन हिंसक संघर्षानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने चीनकडून सायबर हल्ला होण्याचा धोका असल्याचे सांगत सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानंतर पाच दिवसात चिनी हॅकर्सने राज्यात 40,300 सायबर हल्ले केले आहेत. मागील काही दिवसांपासून भारतातील पायाभूत सुविधा, बँकिंग आणि माहिती क्षेत्रातील सायबर स्पेसमध्ये चीनकडून सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. चिनी सायबर हल्ल्यांविरोधात राज्य सरकार फिशिंग हल्ल्याची योजना तयार करत आहे.
भारतावरही सायबर हल्ल्याची शक्यता चिनी हॅकर्सकडून भारतावर सायबर हल्ला होण्याची शक्यता यापूर्वीच गुप्तचर विभागाने वर्तवण्यात होती. भारतातील 20 लाख लोकांचे ईमेल टारगेटवर आहेत. त्यासाठी चीन ncov2019.gov.in या ईमेल आयडीचा वापर करेल. या ईमेलचा विषय ‘Free Covid 19 Test’ असा असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे इमेल नागरिकांनी ओपन करू नयेत, असेही सांगण्यात आले होते.