अलीकडील काळात आक्रमक नेतृत्वामुळे जिन पिंग देखील देशात आणि बाहेर वादात आलेले आहेत पण माओंच्या नंतर एवढी सत्ता आपल्या हाती एकवटणारे ते एकमेव नेते आहेत.
चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाशी मुकाबला करण्याकरता भारताने युद्ध छेडले असताना त्याला आता दुसऱया एका चिनी संकटाशी सामना करावा लागत आहे. लडाखमधील सीमेवरून चिनी सैनिकांनी अलीकडील काळातील सर्वात मोठी घुसखोरी सुरू केली आहे. एकदा एकीकडे घुसायचे आणि एकदा दुसरीकडे अशा पद्धतीने चिनी सेनेने एकप्रकारे लपाछपीचा डाव सुरू करून गेली चाळीस वर्षे शांत असलेल्या सीमेवर एक नवा खेळ सुरू केला आहे. ही बाब अर्थातच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. प्रश्न आहे की त्यामागचे कारण काय? ड्रगनच्या मनात खरेच दडले आहे काय? भारतीय सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या नुकत्याच झालेल्या लडाख भेटीला त्यामुळेच जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
दोन वर्षापूर्वी डोकलाम येथे चिनी आणि भारतीय फौजा 72 दिवस एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या आणि त्यावेळी दाखवलेल्या खंबीरपणामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांची सगळीकडे वाहवाही झाली होती. त्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग यांच्याशी वुहान येथे झालेल्या मोदींच्या बैठकीने वातावरण निवळण्यास मदत झाली होती. एक वर्षापूर्वी मोदी परत दुसऱयांदा पंतप्रधान झाल्यावर शी जिन पिंग यांच्याबरोबर त्यांची दुसरी शिखर वार्ता तामिळनाडुतील मामल्लापुराम येथे झाली होती. त्याला सहा महिने झाले असतानाच चीनने सुरू केलेली ही घुसखोरी म्हणूनच चिंतेचा विषय आहे.
शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन हा जास्त आक्रमक बनत चालला आहे. कोरोना संकटावर चीनने त्वरेने विजय मिळवला आणि त्याचवेळी अमेरिका आणि ब्रिटनसह बऱयाच युरोपियन राष्ट्रांना या विषाणूवर मात करण्यासाठी अजूनही कसरत करावी लागत असल्याने शी जिन पिंग चीनचे नेतृत्व पुढे दामटण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वाभाविकच त्याला अमेरिका आणि युरोपमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे. चीन हेच या विषाणूचे माहेरघर आहे आणि त्याबाबत चीनची झाडून चौकशी झाली पाहिजे अशी मोहीम या राष्ट्रांनी सुरू केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये परत अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीनला खलनायक भासवून आपला प्रचार सुरू केला आहे.
चीनने आपल्या दादागिरीने इतर बरेच शत्रू निर्माण केलेले आहेत. दक्षिण चीन समुद्रात त्याने चालवलेल्या अरेरावीने व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया असे बरेच देश नाराज झालेले आहेत. तैवानमध्ये चीनला विरोध करणारा पक्ष परत सत्तेवर आल्याने शी जिन पिंग भडकले आहेत. तिथे तसेच चीनची कॉलनी असलेल्या हाँगकाँगमध्ये अमेरिका चीनविरुद्ध भावना भडकवत आहे असा चिनी नेतृत्वाचा ठाम ग्रह आहे. वेळप्रसंगी बळ वापरून आम्ही तैवान ताब्यात घेऊ अशा धमक्मया चीन देत असल्याने अमेरिका आणि चीनमधील संघर्ष तीव्र होण्याची भीती काही जणांना वाटते.
सर्वसाधारणपणे सौदी अरेबियासारखे देश सोडता सारे मुस्लिम जगत, रशिया आणि पूर्वाश्रमीच्या सोविएत संघातून जन्माला आलेली बरीच राष्ट्रे ही चीनचा पाठपुरावा करत आहेत. याला कारणेही तशीच आहेत. पाकिस्तान आणि चीनचे गुळपीठ अलीकडच्या काळात वाढले आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या जिन पिंग यांच्या अब्जावधी रुपयांच्या अतिमहत्त्वाकांशी आंतरराष्ट्रीय रोड प्रोजेक्टचा पाक एक मोठा घटक होय. इराण विरुद्ध अमेरिकेने निर्बंध घातले असले तरी त्याला न जुमानता चीन त्या देशाकडून भरपूर तेल विकत घेत आहे. रशियाच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक चीन असल्याने पुतीन यांची राजवट आर्थिकदृष्टय़ा थोडी तारली आहे. आफ्रिकेतील बऱयाच देशांना चीनने मोठी कर्जे देऊन मिंधे केलेले आहे.
प्राचीन काळापासून बरीच मोठमोठी राजघराणी बघितलेल्या चीनला ‘मिडल किंग्डम’ म्हटले जाते. त्यामुळे चिनी मानसिकतेत विश्वाच्या केंद्रबिंदूत आपण आहोत आणि सर्वानी आपले मोठेपण मान्य करून नमते घ्यावे असा तेथील नेतृत्वाचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आग्रह असतो. भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक मंडळात प्रमुखपद मिळाले असताना कोरोनाच्या प्रश्नावर नवी दिल्लीने आपले हितसंबंध जपावेत तसेच तैवानप्रश्नी देखील चीनधार्जिणी भूमिका घ्यावी असे बीजिंगला वाटते. याबाबत भारतावर दबाव आणण्यासाठी तो लडाखमध्ये घुसखोरीचे वाढते प्रकार करतो आहे असे काही जाणकार मानतात. नेपाळनेदेखील अलीकडे जी भारताविरोधात आघाडी उघडली आहे त्याचा बोलविता धनी चीनच आहे असे बोलले जाते.
भारत हळूहळू अमेरिकेच्या जवळ जात आहे असा चीनचा समज झाला आहे असे एका गोटात बोलले जाते. चीन ही जगातील एक उगवती आर्थिक आणि राजकीय महासत्ता असल्याने तिच्याशी वाटाघाटींचे गुऱहाळ लावत जमवून घेण्याचे काम देशातील सर्वच सरकारांनी अलीकडील काळात केला आहे. चाळीस वर्षापूर्वी जनता पक्षाच्या कारकिर्दीत तत्कालीन परराष्ट्र मंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी जेव्हा चीनला भेट दिली होती त्याचे कौतुक इंदिरा गांधींनीदेखील केले होते. 1962 च्या चिनी आक्रमणानंतर भारताच्या एका जे÷ नेत्याची ती पहिलीच चीन भेट होती. वाजपेयींना ती भेट लवकरच गुंडाळावी लागली होती कारण ती सुरू असतानाच चीनने व्हिएतनामवर हल्ला केला
होता.
चीन हे बेभरवशाचे प्रकरण आहे हे 1962 सालापासून वेळोवेळी भारताच्या लक्षात आलेले आहे. मनमोहनसिंग यांनी एकप्रकारे नाकदुऱया काढून चीनला शांत ठेवले होते. ‘जग एवढे विशाल आहे की त्यात चीन आणि भारत दोघांनाही वाव आहे,’ असे फॉर्मुलेशन काढून त्यांनी चीन जसा मोठा आहे तास भारत देखील मोठा आहे असे बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. या घुसखोरीच्या वाढत्या प्रकारामुळे चीनचे हे नवे आव्हान आगामी काळात कसे झेलावयाचे याबाबत मोदींची कसोटी आहे. डोकलामच्या समर प्रसंगात त्यांनी भारत लेचापेचा नाही हा संदेश खचितच दिला होता. अलीकडील काळात आक्रमक नेतृत्वामुळे जिन पिंग देखील देशात आणि बाहेर वादात आलेले आहेत पण माओंच्या नंतर एवढी सत्ता आपल्या हाती एकवटणारे ते एकमेव नेते आहेत हे विसरून चालणार नाही.
सुनील गाताडे