ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखमधील सिमावादावरून भारत-चीनमध्ये तणाव कायम असताना चीनने आता नवी चाल खेळली आहे. चीनने सिक्कीममधील भारतीय सीमेजवळ एक गाव वसवले आहे. हे गाव भूतानच्या हद्दीत दोन किमी आत तर डोकलामच्या अगदी जवळ आहे. याच हद्दीत 2017 मध्ये भारत-चीन सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
चीनच्या सीजीटीएन न्यूजचे प्रोड्युसर शेन सिवेई यांनी गुरुवारी सकाळी यासंदर्भात काही ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी एका गावाचे फोटो शेअर केले. हे गाव डोकलामच्या हद्दीत असून, या गावचे नाव पांगडा असे ठेवण्यात आले असल्याचे नमूद केले आहे.
एका चिनी पत्रकाराने या गावचा नकाशाही प्रसिध्द केला होता. त्यामध्ये हे गाव भूतानच्या हद्दीत दोन किमी आत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, ओपन इंटेलिजेंस सोर्स डेट्रास्फानुसार, पांगडाहे गाव डोकलामपासून 9 किमी अंतरावर असून, हे गाव वसवण्यासाठी चीनने 2019 मध्ये प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येते.