लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या निर्णयावर आक्षेप
वृत्तसंस्था/ बीजिंग
भारतासोबत चर्चेच्या आडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हजारोंच्या संख्येत सैनिक आणि क्षेपणास्त्रांची तैनात करणाऱया चीनने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या निर्णयाला मान्यता देत नसल्याचे म्हटले आहे. भारताने लडाखची स्थापना अवैधपणे केली आहे. या वादग्रस्त भागात भारताच्या सैन्य उद्देशांच्या पूर्तीसाठी पायाभूत सुविधेच्या निर्मितीलाही विरोध करत असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे.
दोन्ही देशांदरम्यान अलिकडेच झालेल्या सहमतीनुसार दोन्हीपैकी कुठलाही एक पक्ष सीमाक्षेत्रात स्थिती बिघडेल असे पाऊल उचलणार नाही. याचमुळे दोन्ही देशांदरम्यान स्थिती सुधारण्यासाठी केल्या जाणाऱया प्रयत्नांना प्रभावित केले जाऊ नये असे चिनी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
भारताने मागील वर्षी 31 ऑक्टोबर रोजी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. भारताच्या या निर्णयापासूनच चीन बिथरला आहे. याचमुळे चीनने पूर्व लडाखमध्ये भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
भारत आणि चीन यांच्यात मागील 5 महिन्यांपासून तणाव सुरू आहे. गलवान खोऱयात दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान हिंसक झटापटीपासूनच सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान चीनला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती घडविण्यासाठी भारताने स्वतःचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र तैनात केले आहे. निर्भय क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
निर्भय क्षेपणास्त्र तैनात
निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राचा मारकपल्ला 100 किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. निर्भय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद अचूक आहे. डीआरडीआने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतात तयार झालेले स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. निर्भय क्षेपणास्त्र पहिल्यांदाच तैनात करण्यात आले आहे. मागील 7 वर्षांपासून ते चाचणीच्या प्रक्रियेत होते. कुठल्याही हवामानात शत्रूचे तळ नष्ट करण्याची क्षमता त्याच्यात आहे. तिबेटपर्यंत मारा करण्याची क्षमता त्याच्यात असल्याचे सांगण्यात येते.