तिन्ही संघर्ष बिंदूंपासून चिनी सेना दोन किलोमीटर मागे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमध्ये भारतीय नियंत्रण रेषेपासून चीनची सेना मागे हटण्याची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झाली आहे. गलवान खोरे, गोर्गा आणि उष्ण झऱयांचा प्रदेश येथे चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत आपले तंबू व इतर साधने आणली होती. ती आता पूर्णतः मागे हटविण्यात आली आहेत असे प्रतिपादन भारतीय सेनेच्या प्रवक्त्यांनी केले. भारताने पडताळणी करूनच या माघारीला दुजोरा दिला आहे.
यामुळे आता भारत गलवान खोऱयात पूर्वीप्रमाणे 15 व्या बिंदूपर्यंत गस्त घालू शकणार आहे. गेले दोन महिने चीनने या बिंदूपर्यंत आपली बांधकामे केल्याने भारताच्या गस्तीला अटकाव होत होता. आता हा भाग रिकामा करण्यात आला आहे. भारतानेही आता आपले सैनिक भारताच्या नियंत्रण रेषेच्या आत आणले आहेत. दोन्ही देशांमध्ये 30 जूनला यासंबंधी ठराव झाला होता.
पुन्हा बोलणी होणार
आणखी एक दोन दिवसात सर्व चीनी सैनिक मागे गेल्यानंतर भारत आणि चीनच्या सेनाधिकाऱयांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होणार आहे. 15 जूनसारखा संघर्ष पुन्हा होऊ नये यासाठी दोन्ही बाजू यापुढे काळजी घेणार आहेत. चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत लक्ष ठेवणार असून त्याप्रमाणे आपला प्रतिसाद देणार आहे.
दोन्ही बाजूंवर बंधने
दोन्ही बाजूंनी संयम बागळगण्याची आवश्यकता आहे. ठरलेल्या नियमांचे पालन दोन्ही बाजूंकडून होणे क्रमप्राप्त आहे. नियंत्रण रेषेवर नेहमीची स्थिती ठेवणे आणि शांततेचा भंग होऊ न देणे हे दोन्ही बाजूंचे कर्तव्य आहे. अद्यापही चीनची काही अवजड वाहने सीमारेषेच्या जवळ आहेत. तीही हटविण्यात येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तणाव निवळण्याची अपेक्षा करता येईल, असे भारताने स्पष्ट केले.