माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींना पत्ररुपी सल्ला : भाजपकडून रोख-ठोक प्रत्युत्तर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांना शब्दांची निवड करताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला आहे. मनमोहन सिंग यांनी मोदींना पत्र लिहिले असून त्यात “पंतप्रधानांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या शब्दांचा वापर चीनला भारताचे समर्थन म्हणून वापरण्याची संधी पंतप्रधानांनी देऊ नये. नियंत्रण रेषेवरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पर्याय वापरावेत तसेच ते चिघळू नयेत यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे,’’ असे म्हटले आहे.
15-16 जूनला गलवान घाटीमध्ये भारताच्या 20 साहसी जवानांना बलिदान दिले. या बहादूर सैनिकांनी साहस दाखवत कर्तव्य पार पाडताना देशासाठी प्राण अर्पण केले. देशाच्या या पुत्रांनी अखेरच्या श्वासापर्यंत मातृभूमीचे रक्षण केले. या सर्वोच्च त्यागासाठी जवान आणि त्याच्या परिवारासाठी कृतज्ञ आहोत. त्याचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.
भाजपाध्यक्षांनी मनमोहनना सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी खरमरीत पत्राद्वारे टीका केल्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपातील शाब्दिक वादाला धार आली आहे. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांना थेट भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. “कोणताही संघर्ष न करता हजारो किलोमीटरमधील भारतीय भूमी चीनला बहाल करणाऱया काँग्रेस पक्षाचेच मनमोहन सिंग हे नेते आहेत. यूपीएच्या काळात भारताने आपला भूभाग गमावला आहे. त्यामुळे आपल्या सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करणे थांबवा. त्यांचा अपमान करू नका’’ असे नड्डा यांनी सुनावले आहे.
भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांना काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले असून भाजप आणि जेपी नड्डा यांनी आता राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात तडजोड करणे थांबवावे, असा सल्ला रणदीप सुरजेवाला यांनी दिला आहे.
उद्योगपती रतन टाटांचे सर्वसमावेशक आवाहन
कोविड-19 संसर्गाच्या या आव्हानात्मक वर्षात, प्रत्येकाने एकमेकांना पाठिंबा देण्याचे मदत करण्याचे आवाहन टाटा सन्सचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे. त्यांनी नेटकऱयांकडून यासंबंधी संवेदनशील प्रतिसादाची अपेक्षाही केली आहे. ऑनलाईन द्वेष, धमकावणे, इतरांना दुय्यम ठरवणे यासारखे प्रकार रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. रतन टाटा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एका पोस्ट शेअर केली आहे. हे वर्ष कोणत्या ना कोणत्या रुपात सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. मी ऑनलाईन ग्रुप्स एकमेकांसाठी हानिकारक ठरत असल्याचे पाहतो आहे. लोक त्वरित मत तयार करून समोरच्याला दुय्यम ठरवत आहेत, असेही त्यांनी खोचकपणे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानातून कोणत्याही एका वक्तव्यावर भाष्य केलेले नसले तरी देशातील एकंदर परिस्थितीसंबंधी सर्वसमावेशक भाष्य केल्याचे दिसते.