मागील महिन्यात ओलांडली होती सीमा – पूल तोडून काढला पळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीमा वादावरून चीनच्या आगळीकी सुरूच आहेत. एकीकडे चर्चेद्वारे वाद सोडविण्याची भूमिका घेणारा चीन दुसरीकडे घुसखोरीचे धाडस करत आहे. नव्या घटनेत उत्तराखंडच्या बाराहोती सेक्टरला लागून असलेल्या सीमाक्षेत्रात चीनच्या 100 सैनिकांनी मागील महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली होती. घुसखोरीचा हा प्रकार आता समोर आला आहे.
चिनी सैनिकांनी 30 ऑगस्ट रोजी घुसखोरी केली होती. 3 तास तेथे राहिल्यावर चिनी सैनिक परतले होते. चीनच्या आगळीकीला प्रत्युत्तर देत भारतीय सैनिकांनी गस्तही घातली होती. पण चिनी घुसखोरीसंबंधी अधिकृतपणे कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही.
अश्वांवरून आलेल्या चिनी सैनिकांनी भातीय सीमेत शिरून तोडफोड केली आणि परतण्यापूर्वी एका पूलाची नासधूस केली आहे. 1962 च्या युद्धापूर्वी बाराहोती भागातच घुसखोरी केली होती.
उत्तराखंडच्या बाराहोती सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारत आणि चीनमध्ये वारंवार वाद होत असतो. पण यावेळी चिनी सैनिकांची संख्या तुलनेत अधिक प्रमाणात होती. चीनने बाराहोती सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक निर्मितीकार्ये देखील वाढविली आहेत.
पूर्व लडाखनजीक चीनच्या हालचाली
चीनने पूर्व लडाखनजीक सुमारे 8 ठिकाणी तात्पुरत्या तंबूसारखी वास्तव्याची व्यवस्था केल्याचे वृत्त मागील आठवडय़ात समोर आले होते. पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तर भागात काराकोरम खिंडीनजीक वहाब जिल्गापासून पीयू, हॉट स्प्रिंग्स, चांग ला, ताशिगॉन्ग, मान्जा आणि चुरुपपर्यंत शेल्टर तयार केले आहेत. तेथे प्रत्येक ठिकाणी 7 क्लस्टर्समध्ये 80 ते 84 पर्यंत कंटेनर्स निर्माण करण्यात आले आहेत.
मागील वर्षी हिंसक झटापट
पूर्व लडाखमध्sय सीमा वादावरून मागील वर्षी चीन आणि भारताच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या संघर्षामुळे उद्भवलेल्या तणावानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने संबंधित भागात डिसएंगेजमेंट पूर्ण केली होती. पण चीन आता पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न करत आहे.