ऑनलाईन टीम / लडाख :
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. तर चीनच्या 43 सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
पूर्व लडाख जवळच्या सामी रेषेवर मागील महिन्याभरापासून भारत आणि चिनी सैन्यांत संघर्ष सुरु आहे. दरम्यान, चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यांमध्ये सोमवारी रात्री आणि मंगळवारी झालेल्या झटापटीत 20 जवान हुतात्मा झाले. तर चीनचे 43 सैनिक ठार आणि गंभीर जखमी झाले आहेत. गॅल्वान खोऱ्यात सुरु असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्रीपासून दोन्ही सैन्यात झटापट आणि चकमक झाली.
यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबाबत निवेदन दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने नेहमीच एलएसीचा आदर केला आहे आणि चीननेही तसे केले पाहिजे. सोमवारी एलएसीमध्ये जे घडले ते टाळता आले असते. दोन्ही देशांचे नुकसान झाले आहे. सीमा क्षेत्रात शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न पहिल्यापासून आहे. आपसांतील वादांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, यावर आमचा विश्वास आहे. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भारताने म्हटले आहे.