भारत निर्मित तंत्रज्ञान विकसित, गुगल करणार 33 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक
मुंबई / वृत्तसंस्था
दूरसंचार क्षेत्रात चीनच्या मक्तेदारीला आता भारत आव्हान देत असून रिलायन्स जिओ या कंपनीने संपूर्ण भारतनिर्मित 5-जी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानावर आधारित 5-जी नेटवर्क पुढील वर्षापासून देशात सादर केले जाणार आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. तसेच गुगल ही कंपनी जिओमध्ये 33 हजार कोटीहून अधिक रूपयांची गुंतवणूक करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
5-जी नेटवर्कसाठी आवश्यक अनुमतीपत्रे देण्यास प्रारंभ झाल्यानंतर पुढील वषी भारतामध्ये हे तंत्रज्ञान सादर करण्यासाठी जिओ सज्ज आहे. तसेच हे तंत्रज्ञान विदेशात निर्यात करण्यासाठी आपली कंपनी सक्षम आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला अनुकूल अशी कंपनीची वाटचाल सुरू असल्याचेही अंबानी यांनी आवर्जून स्पष्ट केले.
33 हजार 737 कोटींची गुंतवणूक
गुगल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती बैठकीमध्ये त्यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्मयांची भागिदारी घेईल. या गुंतवणुकीमुळे गेल्या तीन महिन्यात जिओमध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीचा आकडा 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही या गुंतवणुकीबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. इंटरनेट प्रत्येकापर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने त्याचा वापर करायला हवा, त्यामुळे जिओसोबत भागिदारी केल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया पिचाई यांनी दिली आहे. गुगलने नुकतीच भारतात 75 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे.
भारताला केंद्रस्थानी ठेवूनच…
जिओकडून नवे 5-जी तंत्रज्ञान भारताच्या आवश्यकतांना केंद्रस्थानी ठेवून निर्माण करण्यात आले आहे. ते अस्स्ल भारतीय आहे. त्याची निर्यातसुद्धा इतर देशांना केली जाऊ शकते. यामुळे विनाकारण परदेशांना मिळणारा भारतीय पैसा भारतातच राहणार आहे. तसेच या तंत्रज्ञानाची निर्यात केल्यास भारताला अतिरिक्त उत्पन्नही मिळेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. जिओच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला मोठे पाठबळ मिळणार असल्याचीही चर्चा उद्योगजगतात आहे.
किफायतशीर स्मार्ट फोन
गुगलने भारताचा डिजिटायझेशन कार्यक्रम संवर्धित करण्यासाठी 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे भारताच्या कानाकोपऱयात इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार असून साऱया देशात कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे खेडोपाडय़ांमधील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहचणार आहे. गुगलशी सहकार्याचा भारताला मोठा लाभ होईल, असे अंबानी यांनी स्पष्ट केले. गुगलच्या सहकार्याने किफायतशीर दरातील स्मार्टफोन्सची भारतातच निर्मिती केली जाण्याचीही योजना आहे.
संधींचे भांडार खुलणार
5-जी तंत्रज्ञान भारतातच निर्माण झाल्याने भारतातील युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. भारताची नवअर्थव्यवस्था प्रबळ होईल. भारतात स्मार्टफोन परवडणाऱया दरात मिळू लागेल. यामुळे विविध ऍप्सचा लाभ खेडोपाडय़ांमधील युवकांना मिळून शहर व ग्रामीण भाग यांच्यातील माहिती अंतर कमी होईल, असे अनेक लाभ या तंत्रज्ञानाचे असल्याचे अंबानींनी स्पष्ट केले.