भारतीय सेनेकडून स्पष्टीकरण, हेतुपुरस्सर अफवा पसरविल्याचा आरोप
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख सीमेवर चीनी सेनेने काही भारतीय सैनिकांना पकडून डांबून ठेवल्याचे वृत्त धादांत खोटे आहे, असे स्पष्टीकरण भारतीय सेनेने देले आहे. गेले तीन दिवस हे वृत्त समाजमाध्यमे आणि काही वृत्त वाहिन्यांवरून देण्यात आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर स्थिती स्पष्ट करण्यात आली.
भारतीय सेनेच्या वतीने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात भारतीय सैनिकांना चीनने पकडल्याचा स्पष्ट शब्दांमध्ये इन्कार करण्यात आला. हे वृत्त भारतात गोंधळ पसरविण्यासाठी हेपुपुरस्सर पसरविण्यात येत आहे. त्यावर विश्वास ठेवू नये. कोणताही भारतीय सैनिक चीनच्या ताब्यात नाही. सीमेची सुरक्षा योग्य प्रकारे केली जात आहे. अफवांवर कोणीही विसंबू नये, असे भारतीय सेनेकडून दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
चीनची मोर्चेबांधणी
जम्मू-काश्मीरमधील लडाख येथे भारतीय सीमेनजीक चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढविण्यास प्रारंभ केला आहे. नवे तंबू व चौक्या उभ्या केल्या जात आहेत. बंकर्सचे बांधकामही करण्यात येत आहे. आधुनिक बांधकाम यंत्रसामग्री व शस्त्रेही आणली जात आहेत. भारतावर नव्याने दबाव वाढविण्याचा हा चीनचा प्रयत्न आहे, असे काही आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत व्यक्त केले आहे.
भारताचीही चोख सज्जता
भारतानेही चीनच्या दबावाला न झुगारता आपली सज्जता ठेवली आहे. सीमेपर्यंत रस्ते बांधण्याचे काम सातत्याने सुरू आहे. तसेच चीनच्या सैनिकांची वाढत संख्या पाहता भारतानेही आपल्या तुकडय़ा वाढविण्यास प्रारंभ केल्याचे समजते. लडाख सीमेवर काही स्थानी भारतीय सेना व चीनी सेना एकमेकींच्या समोरासमोर उभ्या आहेत .अद्याप दोन्ही सैन्यांमध्ये कोणताही संघर्ष झालेला नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सेना सज्ज असल्याचे सेनाप्रवक्त्याने स्पष्ट केले. सीमेला धोका नसल्याचेही सांगण्यात आले.