भारताने दिला इशारा : पँगोंग सरोवरक्षेत्रात दिला दणका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पँगोंग सरोवराच्या दक्षिण काठावर चिनी सैन्याच्या आगळीकीला ठोस प्रत्युत्तर दिल्यावर भारताने आता ड्रगनला कारवाया थांबविण्यास सांगितले आहे. चीनने सीमेवरील स्वतःच्या सैनिकांना ‘शिस्त आणि नियंत्रणात’ ठेवावे असे भारताने बजावले आहे. चीनचा डाव उधळून लावल्यावर भारत अधिकच दक्ष झाला आहे. विदेश सचिव हर्ष श्रृंगला आणि सैन्यप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी बुधवारपासून सुरू होणारा स्वतःचा म्यानमार दौरा स्थगित केला आहे.
विशेष प्रतिनिधींसोबतच्या चर्चेत सैन्याला वादग्रस्त भागातून हटविण्याविषयी निर्माण झालेल्या सहमतीचे चीनने उघडपणे उल्लंघन केल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तणावाच्या स्थितीवर जबाबदारीने तोडगा काढण्याबद्दल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे विदेशमंत्री वेंग येई यांच्यातील चर्चेत सहमती झाली होती.
चीनवर अविश्वास
चीन प्रत्यक्षात या तणावावर तोडगाच इच्छित नसल्याचे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिम भागावर नजर ठेवून असल्याचे भारत सरकारचे मानणे आहे. चीनच्या याच वृत्तीमुळे चर्चेला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. पँगोंग सरोवराच्या दक्षिण काठावर झालेल्या अलिकडेच झालेल्या संघर्षात चिनी सैन्याला मोठे नुकसान झाले असून स्पांगुर गॅप आणि चुशूल भागात भारताला मोठी आघाडी मिळाली आहे. हिमालयीन क्षेत्रात चीनचे वर्चस्व निर्माण करण्यावर जिनपिंग यांचा भर आहे. चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. तिबेटला लागून असलेल्या भागात भारताने तयारी केली आहे. तर चिनी सैनिक सिक्कीम, अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेनजीक युद्धसराव करत आहेत.
चिनी सैन्याला झटका
चीनविरोधात एसएसएफची बहुधा सर्वात मोठी कारवाई होती. याचा प्रभाव तिबेटपासून बीजिंगपर्यंत पडणे स्वाभाविक आहे. ही घटना चिनी नेत्यांच्या तिबेटवर झालेल्या एका मोठय़ा बैठकीच्या काही दिवसांतच घडल्याचे उद्गार चीनविषयक तज्ञ क्लाउड अर्पी यांनी काढले आहेत. चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या आदेशाला लागू करण्याच्या धोरणांतर्गत चिनी सैन्याने ही आगळीक केल्याचा दावा लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुबर्तो साहा यांनी केला आहे.