नवी दिली /प्रतिनिधी
पूर्व लडाख सीमेवरील नऊ महिन्यांच्या तणावानंतर पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. नने या भागात केलेल्या अतिक्रमणानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. दोन्ही देशांनी रणगाड्यांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रे या भागात तैनात केली होती. हाडे गोठवून टाकणारी थंडी आणि उणे तापमान असलेल्या या भागातून बुधवार सकाळपासून भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पँगाँग टीएसओच्या दक्षिण किनाऱ्यावरुन चीनने गुरुवारी २०० पेक्षा जास्त रणगाडे मागे घेतले आहेत.
त्यामुळे चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शांतता आणि स्थिर वातावरण निर्माण होण्याची आशा आहे. पँगाँग टीएसओच्या दक्षिण किनाऱ्यावरुन चीनने गुरुवारील २०० पेक्षा जास्त रणगाडे मागे घेतले तसेच जवळपास १०० लष्करी वाहनांमधून सैन्य तुकडयांना उत्तर किनाऱ्यावरील फिंगर भागातून पूर्वेला फिंगर आठ येथे नेऊन सोडले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
फिंगर आठ जवळ चीनचा मुख्य तळ आहे. तिथून ते फिंगर फोर पर्यंत आल्याने हा संघर्ष सुरु झाला होता. चीनच्या माघारीचा वेग पाहून भारतीय लष्कराला आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रणनितीकारांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.