ऑनलाईन टीम / बीजिंग :
भारताने चीनला डावलून अमेरिकेला साथ दिली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. राष्ट्रहितासाठी चीन कोणताही निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा धमकीवजा इशाराच चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने भारताला दिला आहे.
मागील काही दिवसांपासून पूर्व लडाख आणि सिक्कीमच्या सीमावादावरून दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. भारतीय लोकांमध्ये चीनविरोधी भावना वाढत आहेत. दोन्ही देशातील तणाव शांततेत सोडवण्याचा प्रयत्न वरिष्ठ लष्करी पातळीवर सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध चांगले राहिले तर व्यापारातील आयात-निर्यातीचा दोन्ही देशांना फायदा होईल. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. मात्र, भारत चीनला डावलून अमेरिकेसोबत गेला तर चीन देशाच्या हितासाठी राजनैतिक किंवा आर्थिक बाबींवर कोणतीही तडजोड करणार नाही, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे संबंध चांगले राहणे आवश्यक आहे. मात्र, भारत चीनविरोधात गेल्यास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असेही ग्लोबल टाईम्सने अग्रलेखात म्हटले आहे.