क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांची आज बैठक : भारत-प्रशांत क्षेत्राकरता व्यूहनीती
वृत्तसंस्था/ टोकियो
भारत-प्रशांत क्षेत्रात चीनच्या अवैध हालचाली वाढतच चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या (क्वाड देश) विदेश मंत्र्यांदरम्यान आज म्हणजेच मंगळवारी टोकियोत बैठक होणार आहे. ही बैठक चीनच्या कारवायांना आळा घालण्यावर केंद्रीत असणार आहे.
भारत-प्रशांत आणि युरेशियन भागात स्वतःचे आर्थिक हित साधणे आणि सैन्यक्षमता वाढविण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू असताना ही बैठक होत आहे. अलिकडच्या काळात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया समवेत अनेक देशांची चीनबद्दलची भूमिका कठोर झाली आहे.
भारत-चीन तणाव
15 जून रोजी गलवान खोऱयात चिनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यात आल्यापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव आहे. तेथील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. दोन्ही देशांदरम्यान सैन्यस्तरीय चर्चा झाल्या असून त्या निष्फळ ठरल्या आहेत.
जपान कठोर भूमिकेत
शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यापासून जपानने चीनसंबंधीची भूमिका अत्यंत कठोर केली आहे. आबे यांनी अलिकडेच जपानच्या जनतेला चीनविरोधात एकजूट करण्यासाठी यासुकूनी स्मारकाला भेट दिली होती. चीनच्या विरोधाच्या भीतीमुळे जपानचे माजी पंतप्रधान तेथे जाण्यास टाळाटाळ करत होते. चीनची वेगाने होत असलेली सैन्यनिर्मिती गंभीर चिंतेचा विषय असल्याचे नवे संरक्षणमंप्ती नोबुओ किशी यांनी म्हटले आहे. किशी यांना तैवानसोबत दृढ संबंधांसाठी ओळखले जात असल्याने चीन नाराज आहे.
क्वाडचे व्स्वरुप
क्वाडला क्वाड्रिलेट्रल सिक्युरिटी डायलॉग या नावानेही ओळखले जाते. भारत-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या सैन्य हालचालींवर चिंता व्यक्त करत अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाने मिळून ‘क्वाड’ची स्थापना केली होती. 2007 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी क्वाडचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला रशिया आणि चीननेही विरोध केला होता. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया या गटातून बाहेर पडला होता. परंतु नंतर तो पुन्हा सामील झाला होता.