चीनचेही अनेक सैनिक ठार, लडाख सीमेवरील तणावात वाढ, वरीष्ठ सेनाधिकाऱयांची चीनशी बोलणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख गालवन खोरे विभागात चीनी सैनिकांशी भारतीय सैनिकांची झटापट झाली असून त्यात एका कर्नलसह आणखी 2 भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याची घटना घडली आहे. ही चकमक सोमवारी मध्यरात्रीनंतर झाली. या संघर्षात गोळीबार झाला नाही. मात्र शारिरीक झटापटीत जीवीत हानी झाली. चीनचेही अनेक सैनिक ठार झाले असून त्यांची निश्चित संख्या घोषित झालेली नाही.
1975 नंतरचा हा दोन्ही देशांमधील पहिलाच हिंसक संघर्ष आहे. तो संघर्ष अरूणाचल प्रदेशच्या तुलुंग ला येथे झाला होता. त्यात चीनी सैनिकांनी केलेल्या गनिमी हल्ल्यात चार भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. लडाखमधील दोन्ही सेनांमधील हा 1967 नंतरचा पहिलाच संघर्ष आहे.
वरीष्ठ पातळीवर चर्चा
चकमक घडल्यानंतर दोन्ही देशांच्या वरीष्ठ सैनिक अधिकाऱयांनी एकमेकांशी चर्चा करून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मेजर जनरल पातळीवरची ही चर्चा मंगळवार दुपारपर्यंत सुरू होती. या चर्चेचे फलित घोषित करण्यात आले नसले तरी त्यानंतर नव्याने कोणताही संघर्ष झालेला नाही. समस्या सामोपचाराने सोडविण्याचा निर्धार दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांना माहिती
चकमक घडल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी तिन्ही सेनाध्यक्षांशी पुढील रणनितीविषयी चर्चा केली. या चर्चेची आणि संघर्षाची माहिती नंतर राजनाथसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली. पंतप्रधान मोदी यांनीही आवश्यक त्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
चीनचा कांगावा
भारतानेच सीमा ओलांडल्याचा कांगावा नंतर चीनने केला. भारतीय सेनेने सीमेपार घुसखोरी करू नये. आम्ही आतापर्यंत संयमाने स्थिती हाताळली आहे. यापुढेही तसेच करीत राहू. मात्र आमची शांतता कमजोरी समजली जाऊ नये. आम्हाला सीमेवर कोणताही संघर्ष नको आहे. मात्र आम्ही संघर्षाला घाबरतो असे नाही, असे चीनी आधिकाऱयांनी म्हटल्याचे चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. या संघर्षात चीनचेही सैनिक ठार झाले आहेत, असे याच वृत्तपत्राने स्पष्ट केले आहे. नंतरच्या चर्चेचेही वृत्त त्याने दिले आहे.
जखमांमुळे मृत्यू
एक भारतीय कर्नल आणि दोन सैनिक यांचा मृत्यू चीनी सैनिकांनी दगडफेक व रॉडने हल्ला केल्याने झाला, असे अनधिकृत वृत्त आहे. मात्र त्याची पुष्टी भारतीय सेनेकडून करण्यात आली नाही. चीनच्या हल्ल्यात हे सैनिक जखमी झाले. रक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले होते. तथापि, यासंबंधी अधिकृत वृत्त आल्यानंतरच स्थिती स्पष्ट होणार आहे.
5 मे पासून तणाव
लडाखच्या गालवन खोरे व सरोवराच्या परिसरात 5 मे पासून भारत व चीनचे सैनिक एकमेकांच्या दृष्टीला दृष्टी भिडवून उभे आहेत. या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनने केल्याने भारतीय सैनिकांनी जोरदार प्रतिकार केला. तेव्हापासून या भागात तणाव आहे. भारताने या भागात गस्त घालण्यासाठी थेट सीमेपर्यंत रस्ते बांधण्याचा धडाका लावला आहे. चीनचा या बांधकामांना विरोध आहे. त्यामुळे हा संघर्ष उभा राहिला आहे. दोन्ही देशांच्या वरीष्ठ सेनाधिकाऱयांनी अनेकदा तणाव कमी करण्यासाठी चर्चा केल्या आहेत. तथापि, अद्यापपावेतो या चर्चांचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.
दोन्ही बाजूंकडून जमवाजमव
चीनने लडाख सीमेच्या आतल्या भागात मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि वाहनांची जमवाजमव केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही त्याच्या भागात अशाच प्रकारची तयारी केली आहे. सशस्त्र संघर्षाला प्रारंभ झालाच तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे.
भूसेना प्रमुखांचा दौरा स्थगित
भूसेना प्रमुख मनोज नरवणे यांनी या संघर्षाच्या कारणास्तव आपला पठाणकोट दौरा स्थगित केला आहे. सीमेवर भारताची पूर्ण तयारी असून काळजीचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी सेनापती बिपीन रावत यांच्याशीही परिस्थितीविषयी चर्चा करून पंतप्रधान मोदींना माहिती दिली.
भारताचा अतूट निर्धार
चीनच्या कोणत्याही डावपेचांना चोख प्रत्युत्तर देण्याचा भारताने निर्धार केला आहे. चीनच्या दबावतंत्राला आम्ही बळी पडणार नाही. चीनच्या आक्रमक पवित्र्याला त्याच भाषेत उत्तर देण्याचा आदेश भारतीय सैनिकांना देण्यात आला आहे. त्यानुसार भारतीय सैनिक सीमेवर चीनच्या डोळय़ाला डोळा भिडवून उभे आहेत. त्यामुळे चीनचा अधिकच जळफळाट झाला असल्याचे तज्ञांचे मत आहे.
मार्ग प्रकल्प सुरूच राहणार
अरूणाचलप्रदेशपासून लडाखपर्यंतच्या सर्व सीमा प्रदेशांमध्ये रस्ते व इतर संरक्षण पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रकल्प सुरूच राहतील असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. चीनने कितीही प्रयत्न केले तरी भारत हे प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय थांबविणार नाही, असे भारतीय सेनाधिकाऱयांनीही स्पष्ट पेले आहे.
तीन पाक दहशतवादी ठार
चीनशी एका बाजूला संघर्ष सुरू असताना भारताने पाकिस्तान सीमेनजीक दहशतवाद्यांविरोधातील मोहीम सुरूच ठेवली आहे. मंगळवारी शोपियान भागात भारतीय सेनेने तीन पाक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे गेल्या 16 दिवसांमध्ये 28 दहशतवाद्यांना काश्मीर खोऱयात ठार करण्यात आले आहे.
तणावात अचानक वाढ…
ड भारत-चीन सैनिकांच्या झटापटीमुळे लडाख सीमेवर वातावरण तंग
ड भारताचे चीनला जोरदार प्रत्युत्तर, चीनच्या मोठय़ा हानीचेही वृत्त
ड चीनी सेनेचा रॉड आणि दगडफेकीच्या माध्यमातून भारतावर हल्ला
ड परिस्थिती नियंत्रणात लवकरच आणण्याचा दोन्ही बाजूंकडून दावा