ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लडाखमध्ये सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीमुळे सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहीद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी पाठवले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, गलवान खोऱ्यात एकही भारतीय नि:शस्त्र नव्हता. मात्र करारानुसार, तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता. त्यामुळे शस्त्राचा वापर केला गेला नाही, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधताना 18 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे. मला विचारायचं आहे की, शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण? असा सवालही राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे.
चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी उद्या सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. या बैठकीत सरकारची बाजू मांडली जाणार असून याकडे सर्वांचे लक्ष आहे.