प्रतिनिधी/ बेळगाव
चुकतय कोण? कोरोना की आपण? असा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे कोरोनाला कसलीही भीक न घालता फुललेल्या बाजारपेठा होय. लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेले आर्थिक चक्र गतिमान झाले आहे. परंतु जर कोविड-19 च्या अनुषंगाने केलेल्या नियमांचे पालन झाले नाही तर बेळगावमधून कोरोना लवकर हद्दपार होईल, याची शक्मयता निश्चितच कमी होणार आहे.
एकीकडे दररोज कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या उरात धडकी भरवत आहे. तर दुसरीकडे त्याची कोणतीच पर्वा न करता सार्वजनिक ठिकाणी कमालीची गर्दी उसळत आहे. श्रावणानिमित्त फुले, फळे, भाजी, पूजा साहित्य विक्री करणाऱया हातांना काम मिळाले आणि त्यांच्या खिशात चार पैसे खुळखुळले याचा आनंद आहेच. परंतु नियमांचे उल्लंघन हे पुन्हा एकदा सर्व व्यवहार ठप्प करण्यास कारणीभूत होऊ शकते. हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.
श्रावणानिमित्त बाजारपेठेत कमालीची गर्दी उसळत आहे. ही गर्दी नियमांचे पालन करत नसल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. तुरळक रहदारीच्या ठिकाणी पोलीस आढळतात. पण गर्दीच्या ठिकाणी त्यांची अधिक गरज आहे. किराणा दुकान आणि भट्टी यांच्या समोर गेल्या दोन दिवसांपासून झालेली गर्दी ही नेमका कोणता संसर्ग पसरवणार आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
सणवार, उत्सव हवेच. ते जगण्यासाठी बळ देतात. मात्र यंदा त्याहीपेक्षा नियमांचे पालन महत्त्वाचे आहे. सातत्याने सांगूनही अद्याप लोक मास्क वापरण्याबाबत गंभीर नाहीत. ना सामाजिक अंतर पाळण्याबाबत. बहुसंख्य भाजी विपेते मास्क न लावताच विक्री करत आहेत. त्यांच्याकडून खरेदी न करणे हेच शहाणपणाचे ठरेल. जेणेकरून ही मंडळी मास्क वापरण्यास सुरुवात करतील. गर्दी होण्याचा काळ लक्षात घेता वेळेचे योग्य नियोजन करणेही आवश्यक आहे.
नियमांचे पालन प्रत्येकासाठी बंधनकारक
सध्या सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये, आस्थापने, दुकाने व औषध दुकाने, दवाखाने, हॉस्पिटल्स यांच्यातर्फे मास्क आणि सामाजिक अंतर यांचे काटेकोरपणे पालन होत आहे. डॉक्टरांच्या हॉस्पिटल समोरील गर्दी पाहून तक्रार करणाऱयांना आता बाजारपेठेतील गर्दी दिसत नाही का, असा प्रश्न विचारल्यास तो चुकीचा नाही. व्यवसाय कोणताही असो, नियमांचे पालन हे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. एका व्यक्तीने नियमांचे पालन न केल्याने समूहाला त्याचा त्रास होऊन परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विवेक बाळगणे आणि वेळीच शहाणे होणे महत्त्वाचे आहे.
पोलिसांनी वेळीच नियंत्रण आणावे
बेळगावच्या सर्व बाजारपेठांमध्ये होणाऱया गर्दीवर प्रशासनाने व पोलिसांनी वेळीच नियंत्रण आणावे, ही मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन ही बाब तरी गांभीर्याने घेईल का, असा नागरिकांचा प्रश्न आहे.