ऑनलाईन टीम / मुंबई :
संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना मला संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट होता. शरीरात चुकीचे औषध सोडून मला मारुन टाकण्यात येणार होते. पण कर्मचाऱ्याने आधीच मला सावध केल्याने मी जिवंत राहिलो, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी विधासभेत केला.
नितेश राणे म्हणाले, संतोष परब हल्ला प्रकरणात मला अटक झाली होती. यावेळी सावंतवाडी कारागृहात माझी प्रकृती खालावली. कणकवलीमध्ये उपचार सुरू होते. मात्र, वेदना कमी होत नसल्याने मला कोल्हापुरात हलविण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारने मला तिथेच मारण्याचा कट आखला होता. कोल्हापुरातील रुग्णालयात ॲडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी ॲन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचे सांगितलं. ही टेस्ट बळजबरी करण्यात येणार होती. पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की, साहेब सीटी ऍन्जिओ टेस्ट करू नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. कर्मचाऱ्याने वेळीच सावध केल्याने मी आज जिवंत राहिलो.