प्रतिनिधी/ सातारा
माजगावकर माळावर नुकतेच नेत्यांच्या हस्ते घरकुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. कामाला प्रारंभही झाला आहे. हे काम इन्फ्रा ही कंपनी करत आहे. वास्तविक ही निविदा प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचा अहवाल नगरविकास विभागाच्या लेखा विभागाने पाठवला असल्याचे समजते. त्यामुळे माजगावकर माळावर सुरु असलेले घरकुलाचे काम वादाच्या भोवऱयात अडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया ज्यावेळी उघडली त्यावेळी अभियंता भाऊसाहेब पाटील हे रजेवर गेल्याचे समजते.
शहरात यापूर्वीही घरकुले झालेली आहेत. त्यामध्ये सदरबाजार येथील घरकुल तर अजून लाभार्थ्यांना कधी मिळेल याचीच प्रतिक्षा आहे. ठेकेदार बी. जी. शिर्के हे काम अर्धवट सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाच पालिकेने नव्याने घरकुल योजना राबवण्याचा निर्णय घेतला गेला. पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तिनच ठेकेदारांनी सहभाग नोंदवण्यात आला होता. त्यामध्ये एनएलसीएलटीने 8.19 टक्के, पीएच इन्फ्राने 9.82 टक्के तर बीजी शिर्के 20.87 टक्के अशी बोली लावली होती. विशेष म्हणजे ऑनलाईन बोली लावली असताना तिन्ही ठेकेदारांच्या या टक्केवारीमध्ये मोठा फरक आहे. तरीही धड वरचा ना खालचा मधल्याच ठेकेदाराला ठेका देण्यात आला.
घरकुल योजनेचे हे काम तब्बल 200 कोटी रुपयांचे असून त्याबाबत नगरविकास विभागाच्या ऑडिट विभागाने तयार केलेल्या अहवालामध्ये स्पष्टच नमूद केलेले होते की, पर्यावरणाचा दाखला जोडण्यात आला नाही. रेरा कायद्यानुसार काम करावे लागेल. अल्प उत्पन्नाच्या लोकांकरता ही योजना आहे. त्यामुळे ठेकेदार कशा पद्धतीने बांधकाम करणार याचा आराखडा, इस्टीमेटही चांगल्या प्रकारचे हवे आहे. 259 स्वेअर फुटाचे बांधकाम प्रत्येक घरकुलाचे असणार आहे. असे नियम त्यामध्ये दिले होते. त्यानुसार हे बांधकाम सुरु झाले असून हे बांधकाम येत्या काही दिवसात वादाच्या भोवऱयात सापडणार आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया ज्यावेळी उघडण्यात आली होती त्यावेळी अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी यावर सही करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळेच ते सक्तीच्या रजेवर गेले होते. दरम्यान, पालिकेच्या एका अधिकाऱयाने या योजनेचा एक महत्वाचा कागदच दडवून ठेवण्यात आल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.