सांगरूळ / वार्ताहर
२०१९ च्या महापुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सांगरूळ तालुका करवीर येथील अनेक प्रामाणिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले आहे.अतिवृष्टी व महापुरामुळे चालू वर्षी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य व पारदर्शी करावेत अशी मागणी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केली.
सांगरुळ (ता. करवीर) येथील श्री पांडुरंग सेवा सोसायटीच्या सभागृहात झालेल्या शासकीय अधिकारी व शेतकरी यांच्या बैठकीत ते बोलत होते. अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सर्वत्र सुरू आहेत .मागील महापुराच्या वेळी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने न केल्यामुळे गावातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली नाही .यामुळे आता पिकांचे नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू होण्याअगोदरच सर्कल सुहास घोदे, कृषी सहाय्यक सुहास रेपे , तलाठी एस ए काटकर ,ग्रामसेवक पांडुरंग बीडकर या शासकीय अधिकाऱ्याच्या समवेत नुकसानग्रस्त शेतकर्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे वस्तूनिष्ठ व पारदर्शी करावेत अन्यथा चुकीच्या पद्धतीने केलेल्या पंचनाम्याला आमचा विरोध राहील असे ठणकावून सांगितले . तसेच पुररेषा खालील सर्व शेतकऱ्याचे पिकांचे पंचनामे ५० ते १०० % म्हणून नुकसान म्हणून करावे , ज्या शेती मध्ये दोन दिवस पुराचे पाणी आहे त्या पिकांचे ३३ % मध्ये पंचनामे करण्यात यावे, यामध्ये गुंठेवारी पध्दतीने न धरता ते क्षेत्र पूर्णपणे पंचनाम्यात धरण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी बोलताना मंडल अधिकारी सुहास घोदे म्हणाले ज्या शेतकऱ्याचे पिकाचे १०० % नुकसान झाले आहे . त्याचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या सुचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत .यानुसार सध्या पंचनामे सुरू आहेत. यावेळी बोलताना शेतकरी कृष्णात खाडे , अरूण खाडे , नारायण खाडे, रंगराव कोळी यांनी कोणताही शेतकरी पंचनामे,व नुकसानभरपाई पासुन वंचित राहू नये अशी मागणी केली. बैठकीला पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे, बाळासो यादव, रवि खाडे ‘ बळवंत खाडे , विनोद यादव यांचे सह शेतकरी उपस्थितीत होते.
वरिष्ठांनी येऊन पंचनामे करावेत
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पारदर्शक होऊन नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या हेतूने आयोजित केलेल्या बैठकीत कृषिसहायक सुहास रेपे यांनी आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही पंचनामे करणार नाही . प्रांताधिकारी, तहासिलदार , तालुका कृषि अधिकारी यांनी येऊन पंचनामे करावेत,असे थेट अधिकाऱ्यांनाच आवाहन केले .यामुळे उपस्थित शेतकरी मात्र गोंधळून गेले.
अन्यथा आम्हाला जे करायचे ते आम्ही करतो
दोन दिवस पिकामध्ये पाणी आलेल्या पिकांचे पंचनामे करताना यामध्ये गुंठेवारी पध्दतीने न धरता ते क्षेत्र पूर्णपणे पंचनाम्यात धरण्यात यावे अशी मागणी उपस्थित .शेतकऱ्यांनी केली असता कृषीसहाय्यक सुहास रेपे यांनी अशा पिकांचे गुंठेवारी पध्दतीने नुकसान भरपाई साठी ग्राहय मानले जाईल असे सांगताच बाळासाहेब खाडे यांनी अशा पद्धतीच्या पंचनाम्यास आमचा विरोध असून जे तुम्हाला करायचं ते करा ‘ आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो , असा इशारा दिला.