महागठबंधनही अद्याप शर्यतीत, इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यातील जनतेसमवेतच देशाच्या समस्त नागरीकांची क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणाऱया अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील रालोआला किंचित आघाडी असली तरी अंतिमतः कोण विजयी होणार यासंदर्भात अनिश्चितता रात्री उशीरापर्यंत होती. रात्री उशीराच्या वृत्तानुसार रालोआला 123 तर महागठबंधनला 112 जागांवर आघाडी होती. अपक्ष व इतरांना 8 जागांवर पुढावा मिळाला होता. त्याचप्रमाणे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसह अकरा अन्य राज्यांमध्ये झालेल्या विधानसभांच्या मध्यावधी निवडणुकांमध्येही भाजपनेच जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे मध्यप्रदेशातील भाजपचे सरकार आता पूर्णतः भक्कम बनले आहे. कर्नाटकातील पोडनिवडणुकांमध्ये ‘शत प्रतिशत’ यश संपादन करून भाजपने काँगेस व निधर्मी जनता दल यांना धूळ चारल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये सर्व जागांचे कल हाती आले असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 123 जागांवर पुढावा घेत पूर्ण बहुमताच्या दिशेने जोमाने वाटचाल चालविली आहे. मात्र किमान 15 जागांवर क्षणोक्षणी पुढावा कमी अधिक होत असल्याने अंतिमतः कोण विजयी होणार हे निश्चित झाले नव्हते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारचा पराभव करण्याच्या महत्वाकांक्षेने रणांगणात उतरलेल्या ‘महागठबंधा’चे स्वप्न पूर्ण होणार की नितीश कुमार आपली सत्ता राखणार, हे अंतिम क्षणी काय होते यावर अवलंबून आहे. या आघाडीचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळा प्रकरणी कारावास भोगणारे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव करीत आहेत. बिहारमध्ये किमान 80 जागांवर काटेकोर लढत असून त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेवटपर्यंता आशावादी राहण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे.
सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला
बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यासाठी भाजप आणि राजद यांच्यात चुरस आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना क्षणोक्षणी मागे टाकत होते. रात्री उशीरापर्यंत या शर्यतील राजदने आघाडी घेतली होती. तथापि, शेवटच्या क्षणी काय होईल याचे अनुमान काढणे कठीण व्हावे इतका हा संग्राम चुरशीचा आहे.
मध्यप्रदेशात भाजप सरकार भक्कम
बिहार विधानसभा निवडणुकीसमवेतच अन्य 11 राज्यांमध्ये 59 विधानसभा जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. यापैकी मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे बहुमत या राज्यातील 28 जागांवरील मध्यावधी निवडणुकांच्या परिणामांवर अवलंबून होते. तथापि येथे भाजपने 20 जागांवर घसघशीत यश संपादन करून आपले सरकार अधिक भक्कम आणि सुरक्षित केले. भाजपला सत्तेवरून हटविण्याचा निर्धार केलेल्या काँगेसच्या पदरी मध्यप्रदेशमधील मतदारांनी निराशाच टाकली.
सहा महिन्यांपूर्वी काँगेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश काँगेसमध्ये मोठे बंड झाल्याने कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँगेस सरकार कोसळले होते. सिंदिया यांनी काँगेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासह 25 काँगेस आमदारांनीही त्यागपत्र देऊन भाजपची वाट धरली. या सर्व आमदारांना भाजपने या मध्यावधी निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दिली होती. यापैकी 17 जण विजयी झाल्याने भाजपचे बहुमत वाढले आहे.
गुजरात भाजपचाच
गुजरात राज्यात विधानसभेच्या आठ मध्यावधी निवडणुका होत्या. या सर्व मध्यावधी निवडणुका मोठय़ा अंतरांनी जिंकून पुन्हा एकदा भाजपने गुजरातमध्ये आपलेच अधिराज्य असल्याचे सिद्ध केले. भाजपला या सर्व जागांवर सरासरी 53 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यामुळे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी जनतेचे आभार मानले असून 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीतील विजयाची ही नांदी आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशात भगव्याचाच बोलबाला
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 7 पोटनिवडणुका होत्या. त्यापैकी पाच जागांवर विजय मिळवत भाजपने आपले बालेकिल्ले राखले. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱया समाजवादी पक्षाला 2 जागांवर समाधान मानावे लागले. काँगेसचा धुव्वा उडाला असून त्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. याच राज्यातील हाथरस येथे काही दिवसांपूर्वी एका दलित महिलेवर अत्याचार व तिच्या हत्येचे प्रकरण गाजले होते. यासंदर्भात विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली होती. याचा परिणाम भाजपला पोटनिवडणुकांमध्ये भोगावा लागणार अशी अटकळ व्यक्त झाली होती. मात्र, प्रत्यक्ष परिणाम पाहता टीका निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले.
मतगणना धिम्या गतीने
बिहारमध्ये मतगणनेचे कार्य अतिशय धिम्या गतीने चालले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत स्पष्ट कलही मिळाले नव्हते. मध्यरात्रीनंतर सर्व परिणाम हाती येतील अशी शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती. परिणामी उशीराच्या उपलब्ध कलांवरूनच अंतिम परिणामांचे अनुमान काढण्यात आले आहे.
कर्नाटकात भाजप सुस्थिर
कर्नाटक विधानसभेच्या सिरा आणि राजराजेश्वरी नगर या दोन जागांवर मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. यापैकी सिरा ही जागा भाजपने इतिहासात प्रथम जिंकली आहे. तर राजराजेश्वरी नगर या जागेवर भाजपचा हा तिसरा विजय आहे. यामुळे कर्नाटकातही भाजपचे संख्याबळ वाढले असून आता ते 222 पैकी 121 इतके झाले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासाठी ही घडामोड दिलासादायक आहे.
एक्झिट पोलची अनुमाने चुकीची
गेल्या शनिवारी मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी बिहारच्या परिणामांसंबंधीच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष प्रसिद्ध केले होते. त्यात सर्वसाधारणपणे नितीश कुमारांना सत्ता गमवावी लागणार असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. दोन संस्थांनी तर महागठबंधनाला 150 ते 180 जागा मिळतील असे भाकित केले होते. तथापि, रात्री उशीरा उपलब्ध झालेल्या कलांनुसार तरी ही सर्व सर्वेक्षणे सपशेल चुकल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान मोदी अधिकच सामर्थ्यवान
बिहारची निवडणूक रालोआने जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रपातळीवरील सामर्थ्य अधिकच वाढणार आहे. या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या विरोधात प्रस्थापित विरोधी भावना तीव्र असल्याचे दिसून आले आहे. तथापि, या चुरशीच्या लढतीत रालोआ यशस्वी ठरल्यास तो प्रामुख्याने पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा विजय मानण्यात येईल. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय लोकप्रियतेचा आलेखही भविष्यकाळात आणखी उंचावणार आहे.