कारकिर्दीत प्रथमच उपकर्णधारपदाची जबाबदारी, यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसोटी गुरुवारपासून
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनुभवी फलंदाज रोहित शर्माकडे कारकिर्दीत प्रथमच भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद सोपवले गेले आहे. यापूर्वी मेलबर्न कसोटीत ही जबाबदारी चेतेश्वर पुजाराकडे होती. आता रोहित संघात दाखल झाल्यानंतर संघव्यवस्थापनाने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
नियमित कर्णधार विराट कोहली ऍडलेडमधील पहिली कसोटी पार पडल्यानंतर पितृत्वाच्या रजेवर मायदेशी रवाना झाला. त्यानंतर दुसऱया कसोटीसाठी पुजारा उपकर्णधार असेल, हे जाहीर केले गेले. मात्र, रोहित तंदुरुस्त होऊन संघात परतेल, त्यावेळी त्याच्याकडेच उपकर्णधारपद असेल, हे त्याचवेळी निश्चित केले गेले होते, असे समजते.
‘विराटने ब्रेक घेतल्यानंतर व अजिंक्य रहाणेला बढती दिली गेल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे असेल, त्याबद्दल संघव्यवस्थापन स्पष्ट होते. रोहित उपलब्ध नव्हता, त्यामुळे, पुजाराकडे तात्पुरत्या स्वरुपात ही जबाबदारी सोपवली गेली’, असे एका वरिष्ठ स्तरावरील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले. ‘रोहित प्रदीर्घ कालावधीपासून मर्यादित षटकातील संघाचे उपकर्णधारपद भूषवत आहे. त्यामुळे, विराटच्या गैरहजेरीत, नेतृत्व गटात समाविष्ट होण्यासाठी तोच अधिक अनुभवी ठरतो’, असे या सूत्राने नमूद केले.
रोहित शर्माने सिडनीतील एका अपार्टमेंटमध्ये 14 दिवसांचे सक्तीचे, कठोर क्वारन्टाईन पूर्ण केले आणि बुधवारी तो भारतीय संघात दाखल झाला. संघात दाखल झाल्यानंतर अर्थातच त्याचे जोशपूर्ण स्वागत केले गेले.
आता रोहित सलामीला उतरणार का, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. रोहित सलामीला खेळू इच्छित असेल तर शुभमन गिल त्याचा सहकारी असेल व या परिस्थितीत मयांकला वगळले जाईल आणि रोहित मध्यफळीत खेळणार असेल तर हनुमा विहारीला संघातून बाहेर व्हावे लागेल, असे सध्याचे संकेत आहेत. रोहितने गुरुवारपासून हलक्या सरावाला सुरुवात केली. मात्र, शनिवारपासूनच तो संघासमवेत पूर्ण सत्रात सहभागी होईल, असे संकेत आहेत.
रोहितने 46 पेक्षा अधिक सरासरीने 32 कसोटी सामन्यात 2141 धावा केल्या असून यात 6 शतकांचा समावेश आहे. त्याने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साकारलेली 212 धावांची खेळी कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. भारतीय संघ मंगळवार दि. 5 रोजी सिडनीकडे रवाना होणार असून दि. 7 जानेवारीपासून या मालिकेतील तिसऱया व नव्या वर्षातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे.
कसोटी संघात उमेश यादवऐवजी टी. नटराजनचा समावेश
मेलबर्न : तामिळनाडूचा यॉर्कर सेन्सेशन थंगसरु नटराजनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया कसोटी सामन्यात संधी मिळाली असून सिडनीत तो आपले कसोटी पदार्पण नोंदवणार आहे. उमेश यादव दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकला गेल्यानंतर भारतीय संघव्यवस्थापनाने त्याच्याऐवजी टी. नटराजनला संधी देण्याचा निर्णय घेतला. आणखी एक दुखापतग्रस्त गोलंदाज मोहम्मद शमीची जागा शार्दुल ठाकुर घेईल, हे यापूर्वी निश्चित झाले आहे.
‘उमेशला मेलबर्न कसोटीतील तिसऱया दिवसाच्या खेळात पोटरीची दुखापत झाली आणि मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने टी. नटराजनची निवड केली. शार्दुल ठाकुर हा आणखी एक दुखापतग्रस्त गोलंदाज मोहम्मद शमीची जागा घेईल’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ईमेलद्वारे नमूद केले. दुखापतग्रस्त शमी व उमेश यादव आता वैद्यकीय उपचारासाठी बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे रवाना होणार आहेत.
29 वर्षीय टी. नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या या कसोटी मालिकेदरम्यान नेटमधील गोलंदाज म्हणून सुरुवात केली आणि नंतर टी-20 व वनडे संघातही स्थान प्राप्त केले. त्याने राष्ट्रीय संघातर्फे 4 सामन्यात 8 बळीही (वनडेत 2 व टी-20 मध्ये 6 बळी) घेतले. टी. नटराजनने तामिळनाडूतर्फे 20 प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळले असून आता पारंपरिक कसोटी प्रकारात अंतिम निवडीसाठी तो स्पर्धेत असेल. उभय संघातील 4 कसोटी सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
भारतीय कसोटी संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रित बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन.
शोएब अख्तर म्हणतो, बुमराह हा ‘स्मार्ट’ जलद गोलंदाज!
‘पाकिस्तानच्या जलद गोलंदाजांनी हवेतून चेंडूची दिशा बदलत प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवा देण्याची कला आत्मसात केली होती. त्याच परंपरेचा जसप्रित बुमराह आणखी एक पाईक आहे आणि खऱया अर्थाने आता जे गोलंदाज आहेत, त्यात बुमराह मला स्मार्ट जलद गोलंदाज भासतो’, असे प्रशंसोद्गार शोएब अख्तरने काढले. केवळ सातवे पावले व पाच सेकंदाचा रनअप घेत बुमराह अचूक वेध घेण्यात यशस्वी होतो, ते निश्चितच कौतुकास्पद आहे, असे तो म्हणाला. स्पोर्ट्स टुडे या यूटय़ूब चॅनेलवर तो बोलत होता.
‘वासिम अक्रम, वकार युनूस आणि त्यानंतर मी असे आम्ही तिघेही गोलंदाज आमच्या कालावधीत वाऱयाची दिशा पाहून त्यानुसार गोलंदाजीत लवचिक बदल करायचो. याचमुळे मलाही चांगला रिव्हर्स स्विंग मिळायचा. माझ्या मते बुमराहला या सर्व बाबींची उत्तम कल्पना आहे. हुशारीच्या निकषावर मोहम्मद असिफ, मोहम्मद आमीर यांच्यानंतर बुमराह हा स्मार्ट गोलंदाज आहे. जर त्याची पाठ उत्तम राहिली तर बुमराह प्रदीर्घकाळ खेळत राहू शकेल. वास्तविक, त्याच्या अपारंपरिक शैलीवर बरीच टीका झाली. पण, आपल्या कामगिरीतून त्याने सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जर तुम्ही दिवसभरात त्याला एकाच टप्प्यावर 60 चेंडू टाकायला लावले तर ते देखील तो सहजपणे करेल’, असा विश्वास अख्तरने पुढे व्यक्त केला.
केवळ सात पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करणे इतके सोपे अजिबात नसते. पण, विकेटवर येत असताना तो क्रीझचा उत्तम विनियोग करुन घेतो. डावखुऱया फलंदाजांना तो आऊटस्विंगर्स टाकू शकतो आणि त्याचप्रमाणे उत्तम इनस्विंगही करु शकतो. त्याला विकेट घेण्याची कला उत्तमरित्या आत्मसात आहे, असे शोएब अख्तर स्पष्टीकरणार्थ म्हणाला.