गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
भाजप सरकार चोडणचा विकास करण्यात अपयशी ठरले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चोडण येथील पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मागील काही वर्षात काहीच विकास झालेला नाही. याशिवाय चोडण येथील कावा खाजनच्या बंधाऱयाची लवकरात लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे मयेचे नेते संतोषकुमार सावंत यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पक्षाच्या युथ विंगचे समरेश वायंगणकर, गोवा फॉरवर्ड पक्ष गटउपाध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर व युवा उपाध्यक्ष रूनल केरकर उपस्थित होते.
2012 सालच्या जाहीरनाम्यात भाजपकडून चोडणचा विकास व इतर गोष्टी समाविष्ट करण्यात आले होते. परंतु पर्यटनदृष्टय़ा काहीच विकास करण्यात आलेला नाही. फक्त खोटी आश्वासने देऊन भाजप सरकारने गोमंतकीयांकडे दुर्लक्ष केले आहे. आपला जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्यात भाजप अपयशी ठरले आहे. याशिवाय चोडण येथील कावा खाजनाची ताबडतोब दुरूस्ती करणेही गरजेचे आहे. या खाजनामुळे सुमारे 400 शेतकऱयांची शेतजमीन पाण्याखाली गेली असून त्याचा फटका शेतकऱयांना बसला आहे. स्थानिक आमदार या समस्यांकडे कानाडोळा करत असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याविषयी पत्र लिहिले असून त्यांनी लवकरात लवकर यात लक्ष देणे आवश्यक आहे असे श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.
कावा खाजन बंधाऱयाला तडे गेल्याने चोडण व पोंबुर्फाकडील रस्ता पाण्याखाली जातो, त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. जर रस्ता वाहून गेला तर यासाठी फक्त सरकार जबाबदार असेल. स्थानिक आमदारांनी या समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. याशिवाय प्रश्नही सोडविले नाहीत. आता किमान सरकारने ज्या शेतकऱयांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱयांना भरपाई द्यावी अशी मागणी समरेश वायंगणकर यांनी यावेळी केली.