उदय सावंत/ वाळपई
चोर्ला घाट परिसरात गोवा बेळगाव हद्दीवरील महामार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या मार्गावरून होणाऱया अवजड वाहतुकीवर अद्याप निर्बंध न लावल्यामुळे डांबरीकरणाचे काम रखडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने या मार्गावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. यासाठी महामार्गावरून सरकारने त्वरित अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी प्रवाशांसह लोकांमधून होत आहे.
दरम्यान महामार्ग प्राधिकारणाने ही वाहतूक बंद करण्याबाबत निवेदन गोवा सरकारला लेखी कळविले आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे या महामार्गावरील हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्यास नक्कीच विलंब होण्याची शक्यता आहे.
सांखळी ते बेळगाव हद्दिपर्यंतच्या महामार्गाचे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे यासंदर्भात हॉटमिक्स काम हाती घेतले आहे. आठ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून हे काम रखडले आहे. या महामार्गावर अवजड वाहतुकीला जिल्हाधिकाऱयांनी पूर्णपणे बंदी घातली होती. तरीही जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे पालन होत असल्याचे दिसत नाही त्यामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत.
आठ दिवसांत अवघ्या दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. यामुळेच महामार्ग प्राधिकारणाने राज्य सरकारला खास पत्र लिहून ही वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली आहे. या पत्राची सरकारने कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी कोंडी
अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. बहुतांश वेळ प्रवासातच जातो. त्यामुळे त्यांच्यासमोर विविध समस्या निर्माण होतात. हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करताना ठेकेदाराला कसरत करावी लागत आहे. सोयीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली जात असल्यामुळे वेळ वाया जातो. दीड ते दोन तास वाहतूक कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया छोटे वाहनधारकांसह प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
कामगारांच्या जीवितास धोका
सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व भरधाव वेगाने होणाऱया अवजड वाहतुकीमुळे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करणाऱया कामगारांना अपघात होण्याची भीती आहे. गेल्या आठ दिवसांत या मार्गावर अपघाताच्या दोन घटना घडल्या असून यामध्ये काही कामगार जखमी झाले आहेत. वारंवार अडथळे निर्माण होत असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण वेळेत पूर्ण होणार की नाही, याबाबत ठेकेदारालाही चिंता लागून राहिली आहे. अशा स्थितीत कामाचा दर्जा कसा राखावा, असा प्रश्न ठेकेदाराला सतावत आहे. डांबरीकरणाचे काम दर्जेदार न झाल्यास या रस्त्याची पुन्हा एकदा वाताहत होण्याची शक्मयता आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
संध्याकाळपर्यंत अवजड वाहतूक बंद करा
रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करायचे असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे. गोव्यातून बेळगावाला विविध प्रकारच्या मालाच्या खरेदीसाठी जाणाऱया लोकांची संख्या मोठी आहे. हा रस्ता महत्त्वाचा व जवळचा मार्ग मानला जातो. यामुळे जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत गोव्यासह बेळगाव बाजारपेठेवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन अवजड वाहतुकीवर निर्बंध आणावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
पोलिसांकडून बघ्याची भूमिका
वास्तविक वर्षभरापूर्वी या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी आदेश दिले आहेत. मात्र त्याची रितसर अंमलबजावणी होत नाही. बेळगाव येथून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे. ती बंद करावी, अशी मागणी केली असता, पोलीस यंत्रणा याबाबत वेगवेगळी कारणे देतात. बेळगावरून येणाऱया वाहनांना चलन देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, असे पोलिसाकडून सांगण्यात येते. मात्र गोव्यातूनही बेळगावच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होते. याबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप प्रवाशांतून केला जात आहे.