अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने पाणी टंचाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील पाणी टंचाईचे ग्रहण अद्यापही सुटले नाही. अनगोळ परिसरात ऐन सणादिवशीच पाणी पुरवठा अचानकपणे बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. चौविसतास पाणी पुरवठय़ासह विविध भागातील पाणी पुरवठा रविवारी बंद झाल्याने पाण्यासाठी धावपळ करावी लागली.
दिवाळी सणाच्या तोंडावर हिडकल योजनेतील विद्युतपंप बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. पण आठ दिवसाहून अधिक पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. अशातच हिंडलगा पंपिंगस्टेशनाचा पाणी पुरवठा बंद झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शनिवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे पाणी पुरवठा मंडळाकडून सांगण्यात आले होते. पण पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. उलट अनगोळमधील 24 तास पाणी पुरवठा योजनेसह विविध भागातील पाणी पुरवठा रविवारी दुपारपासून खंडीत झाला आहे. यामुळे पाण्याची समस्या भेडसावत असून सणादिवशीच पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली. चोविस तास पाणी पुरवठा होत असलेल्या परिसरात पाणी साठा केला जात नाही. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने हाल होत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
हिडकल पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पंप बदलण्याचे काम करण्यात आल्याने पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. पण राकसकोप जलाशयामधून उपलब्ध झालेले पाणी संपुर्ण शहराला पुरवठयात करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडले असल्याने अनगोळ परिसरातील पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसात संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली.