प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील होडखाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघ्या 24 तासांतच घोषित केलेल्या सरपंचाच्या जागी दुसऱयाच महिलेची वर्णी लावण्याचा प्रकार पुढे आला आहे. तालुका प्रशासनाच्या या अजब कारभाराने सारेच अवाक् झाले आहेत. सरपंच निवड प्रक्रियेवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी ग्रामविकास मंत्री व जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी पत्रकारांना दिली.
तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपद निवडणुकीदरम्यान होडखाड येथे सरस्वती माळी, रसिका तांबे यांनी सरपंचपदासाठी, तर समीर तांबे यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला होता. यातील सरस्वती माळी यांनी स्वेच्छेने अर्ज मागे घेतल्यानंतर रसिका तांबे यांना सरपंच, तर समीर तांबे यांना उपसरपंच घोषित करण्यात आले.
मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी सायंकाळी 7 वाजता सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया चुकीची असल्याचे सांगून बुधवारी सरपंचपदी सरस्वती माळी व उपसरपंचपदी समीर तांबे यांची निवड झाल्याचे घोषित केले. या प्रक्रियेस विरोध केल्यास व प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत बंद करण्यात येईल, असे शासकीय कर्मचाऱयांनी सांगितल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
शासनाच्या नियमानुसार मंगळवारी घोषित झालेले सरपंच आरक्षणाच्या नियमात बसत नसते तर कायदेशीर प्रक्रिया करून सरपंचपद बाद करून हे पद रिक्त ठेवण्यात आले असते. मात्र बुधवारी बेकायदेशीररित्या सरपंचपदाची घोषणा करून तालुका प्रशासनाने अजब कारभार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सलग दोन दिवस एकाच तारखेने दोनवेळा सरपंचपदाचा कार्यक्रम करून सरपंच घोषित केलेल्या महिलेच्या जागी दुसऱया दिवशी दुसऱयाच महिलेची वर्णी लावल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याप्रकरणी ग्रामविकास मंत्री व जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागणार असल्याचे हशमत परकार व ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
असा कोणताही प्रकार घडलेला नाही- तहसीलदार
याबाबत तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता असा कुठलाच प्रकार झालेला नाही. नियमानुसारच सरपंचपदाची निवडणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.