देशात मृतांचा आकडा 17 हजार 400 वर : एकूण रुग्णसंख्या सहा लाखांच्या उंबरठय़ावर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून मागील 24 तासात तब्बल 507 जणांचा मृत्यू झाला. चोवीस तासांमध्ये मृतांचा आकडा पाचशेच्यावर जाण्याचा बुधवार हा पहिलाच दिवस ठरला. यापूर्वी एकदा मृतांचा आकडा दोन हजारच्या वर गेला होता. मात्र, त्यामध्ये मागील आकडेवारीतील तफावत दर्शविण्यात आली होती. बुधवारपर्यंत 18 हजार 653 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 85 हजार 493 वर पोहोचली आहे.
देशात सध्या 2 लाख 20 हजार 114 रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 3 लाख 47 हजार 979 जणांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात 17 हजार 400 जणांना जीव गमावावा लागल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणही वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. तरीही मृतांचा आकडा कमी करण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही.
देशात महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक कोरोनारुग्ण आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये देशातील 85.5 टक्के रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सध्या 1 लाख 75 हजार रुग्ण असून तमिळनाडूमधील रुग्णसंख्या 90 हजार 167 झाली असून दिल्लीमध्ये एकूण रुग्णसंख्या 87 हजार 360 झाली आहे. त्यापाठोपाठ साधारणपणे गुजरातमध्ये 32 हजार, उत्तर प्रदेशमध्ये 24 हजार, पश्चिम बंगालमध्ये 19 हजार आणि राजस्थानमध्ये 18 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.