प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाचा जोर वाढल्याने शहर आणि उपनगरांतील विविध भागांमध्ये पाणी शिरण्यास प्रारंभ झाला आहे. टिळकवाडी चौगुलेवाडी आणि अन्नपूर्णेश्वरी नगर परिसराला पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे. चौगुलेवाडीतील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे येथील 35 रहिवाशांचे स्थलांतर टिळकवाडी येथील कैवल्य योग मंदिरातील निवारा केंद्रात करण्यात आले आहे.
चौगुलेवाडीतील कित्येक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे आता कोरोनासोबत पूर परिस्थितीचा सामना नागरिकांना व महापालिका प्रशासनाला करावा लागत आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी महानगरपालिकेने 14 ठिकाणी निवारा केंद्रांची व्यवस्था केली आहे. यापैकी कैवल्य योग मंदिर आणि वडगाव जेल शाळा ही दोन केंदे रविवारपासून सुरू करण्यात आली आहेत. चौगुलेवाडी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर होण्याची सूचना करण्यात आली. परिसरातील 35 नागरिकांनी सहकार्य केले असून या नागरिकांना कैवल्य योग मंदिरात स्थलांतर करण्यात आले आहे. उर्वरित रहिवाशांना स्थलांतर होण्याची सूचना करण्यात आली, पण काही नागरिकांनी नकार दर्शविला आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर शास्त्रीनगर, समर्थनगर, मराठा कॉलनी, नानावाडी अशा विविध भागाला पावसाचा फटका बसतो. मात्र यंदा प्रथम पावसाचा फटका चौगुलेवाडीला बसला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत असून पावसाचा जोरही वाढला आहे. त्यामुळे निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात येणाऱया नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक खबरदारी घ्यावी लागत आहे. 14 पैकी दोन निवारा केंदे तात्काळ सुरू करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार उर्वरित केंदे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पावसामुळे बळ्ळारी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, परिसरातील शिवार पाणीमय झाले आहे. सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नाल्याकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. बळ्ळारी नाल्याचे पाणी अन्नपूर्णेश्वरी नगरात शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे. पूरस्थिती निर्माण झालेल्या भागातील नागरिकांचे स्थलांतर निवारा केंद्रात करण्यात येत आहे. अन्नपूर्णेश्वरी नगरातील रहिवाशांनाही स्थलांतर होण्याची सूचना करण्यात आली आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास येथील नागरिकांना निवारा केंद्रात हलविण्यात येणार आहे.