9 जिल्हय़ांमधील 59 मतदारसंघांमध्ये 624 उमेदवार
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात आज बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यात मध्य उत्तर प्रदेशातील 9 जिल्हय़ांमधल्या 59 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 मतदारसंघांपैकी 51 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपचा मित्रपक्ष असणाऱया अपना दलने 1 जागा मिळवली होती. काँग्रेसच्या दोन जागा होत्या.
या टप्प्यात उत्तर प्रदेशची राजधानी असणारे लखनौ शहर आणि लखनौ जिल्हय़ात मतदान होत आहे. या जिल्हय़ात 9 मतदारसंघ आहेत. पिलिभित, लखीमपूर-खेरी, सीतापूर, लखनौ, हार्दोई, उन्नाव, रायबरेली, फतेपूर, रायबरेली आणि बांदा या जिल्हय़ांमध्ये मतदान होईल. या टप्प्याबरोबरच उत्तर प्रदेशातील 50 टक्क्यांहून अधिक विधानसभा निवडणूक पूर्ण होईल. हा टप्पा भाजपसाठी सर्वात महत्वाचा ठरणार आहे. काँगेससाठीही हा अस्तित्वाचा प्रश्न म्हणून समोर येणार आहे. रायबरेली हा काँगेस नेत्या सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे काँगेसची कामगिरी कशी होते याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. मागच्या निवडणुकीत काँगेसला दोन जागा मिळल्या होत्या. मात्र, हे दोन्ही आमदार आता भाजपमध्ये समाविष्ट झाल्याने काँगेससमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे.
भाजपने येथे गेल्या निवडणुकीत भरघोस यश मिळविल्याने यंदा या पक्षाची कामगिरी कशी होते हा देखील चर्चेचा विषय आहे. काही मतदारसंघांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवार उभे आहेत. या टप्प्यात सपचा फरसा प्रभाव नाही. तसेच काही भाग सोडले तर बसपचीही मोठी हवा नाही. लखनौ जिल्हय़ात भाजपने 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 9 पैकी 8 जागा मिळविल्या होत्या. हा टप्पा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.