साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लढतीच्या चौथ्या दिवशी देखील संततधार पाऊस कायम राहिला आणि एकही चेंडू न टाकला जाता दिवसभराचा खेळ रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर आली. या लढतीच्या तिसऱया दिवशी भारताच्या सर्वबाद 217 धावांना उत्तर देताना न्यूझीलंडने 3 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या दिवसात देखील ओलसर खेळपट्टीमुळे खेळाला उशिरा सुरुवात झाली आणि अंधुक प्रकाशामुळे नियोजित वेळेपूर्वीच खेळ थांबवावा लागला होता.
या सामन्यात पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही आणि दुसऱया दिवशी केवळ 64.4 षटकांचा खेळ झाला होता. तिसऱया दिवशी थोडेफार क्रिकेट झाले असले तरी त्यातही अंधुक प्रकाशामुळे खेळ सुरु-बंद पाठशिवणीचा खेळ अव्याहत चालत राहिला. या सामन्यात आतापर्यंत फक्त 141.1 षटके टाकली गेली असून राखीव सहाव्या दिवसाचा अवलंब आयसीसीला करावा लागेल, हे जवळपास निश्चित आहे. ही लढत निकाली होऊ शकली नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल, असे आयसीसीच्या प्लेईंंग कंडिशन्समध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या लढतीत सातत्याने पावसाचा व्यत्यय येत राहिल्यानंतर भारत व न्यूझीलंडच्या काही माजी खेळाडूंनी हा सामना लहरी हवामानाच्या ठिकाणी भरवल्याबद्दल आयसीसीवर टीका केली. ‘चाहत्यांसाठी हा अतिशय वाईट दिवस आहे. आयसीसीने योग्य नियम केलेले नाहीत, असे जाणवते. असाच पाऊस बरसत राहिला तर राखीव सहावा दिवस देखील कमी पडेल’, असे व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला.
‘साऊदम्प्टनची खेळपट्टी गोलंदाजांसाठी इतकी उत्तम आहे की, अगदी 3 ते 4 दिवसांचा खेळ झाला तरी सामना निकाली होऊ शकतो. तरीही, 5 दिवसांचा 450 षटकांचा खेळ व्हावा, इतकेच ध्येय समोर ठेवले असते तरी पुरेसे ठरु शकले असते’, असे शेन बाँडने नमूद केले. यापुढे जर पुरेसा खेळ होऊ शकला तर न्यूझीलंडला सामन्यातील शेवटच्या दिवशी अगदी 150 ते 160 धावांचे आव्हान देखील अवघड असेल, असा अंदाज माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरने व्यक्त केला.
केपी म्हणतो, असे महत्त्वाचे सामने इंग्लंडमध्ये भरवू नका!
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनलसारखे अतिशय महत्त्वाचे सामने लहरी हवामान असलेल्या इंग्लंडमध्ये भरवू नका, अशी स्पष्ट सूचना इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने सोमवारी केली. भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनल लढतीत सातत्याने पावसाचा व्यत्यय येत राहिला असून या पार्श्वभूमीवर तो बोलत होता. ‘इंग्लंडमध्ये असे सामने खेळवू नका, असे म्हणणे वेदनादायी आहे. पण, ही लढत दुबईमध्ये भरवणे अधिक योग्य ठरले असते’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.