राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री माधुस्वामी यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
महिन्याच्या चौथ्या शनिवारी सुटी न घेणाऱया सरकारी कर्मचाऱयांना 10 दिवसांऐवजी 15 दिवस प्रासंगिक रजा विस्तरीत करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांसह काही सरकारी कर्मचाऱयांच्या कपात करण्यात आलेल्या प्रासंगिक रजा 10 वरून 15 पर्यंत वाढविण्यात संमती देण्यात आली आहे, अशी माहिती कायदा आणि संसदिय मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी दिली.
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या राज्यातील 351 कल्याण संस्थांना स्थगित करण्यात आलेले तांदूळ आणि गहू दासोह योजनेंर्गत सुरू ठेवण्यात येणार आहे. राज्यातील 37700 विद्यार्थी 351 कल्याण संस्थेत शिकत आहेत. या संस्थाना एका वर्षासाठी अन्नधान्य पुरविण्यासाठी दासोह योजनेंतर्गत 18 कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गुलबर्गा विश्वविद्यायाचे विभजन करून रायचूर विश्वविद्यालय स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारी शाळेतील 1 ते 3 पर्यंतच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना नली-कली योजनेंतर्गत 27 कोटी खर्चातून शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे. याचबरोबर सरकारी इस्पितळात नूतन 120 रुग्णवाहिका खरेदीसाठी 31.04 रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
बिदरमध्ये विशिष्ठ कारागृह निर्मितीसाठी 99.95 कोटी रुपये खर्च करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच कौशल्यविकास योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या अनुदानित आणि खासगी आयटीआय केंद्रात शिकत असलेल्या 3401 विद्यार्थ्यांना 7.30 कोटीच्या खर्चातून लॅपटॉप वितरण करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, असेही मंत्री माधुस्वामी यांनी सांगितले.