अनगोळ भागात पाणी समस्या, नागरिकांचे हाल
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने 24 तास पाणीपुरवठा योजनेसह अनगोळ भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेतील नळांना पाणी नसल्याने नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आल्यानंतर पाणीपुरवठय़ाबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. विविध भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे गळती निवारणाकडे देखील कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. अनगोळ भागात 24 तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अनगोळ भागातील नळांना पाणी नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर 24 तास पाणी योजनेंतर्गत अनगोळ-भाग्यनगर परिसरात घरोघरी नळजोडणी देण्यात आली होती. तसेच ही योजना यशस्वी झाल्याचे सांगून संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारिकरण करण्यात येत आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी एल. ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनाचा कारभारदेखील या कंपनीकडे देण्यात आला आहे. 24 तास योजनेचे काम सुरु होण्यापूर्वीच विविध भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होवू लागली आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणाऱया अनगोळ भागाला देखील याची झळ बसली असून गेल्या दोन दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत का झाला नाही? याबाबत नागरिकांनी चौकशी केली असता. विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याने पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी नागरिकांना दिली. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अनगोळ भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
जलवाहिनीला गळती लागली असून हजारो लीटर पाणी वाया
हिंडलगा पंपहाऊसमधून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करण्यात येणाऱया जलवाहिनीला गळती लागली असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली आहे. पण याची दुरूस्ती करण्यात आली नसल्याने मंगळवारी दिवसभर गळतीद्वारे विजयनगर मुख्य रस्त्यावरून मोठय़ाप्रमाणात पाणी वाहत होते.