विधानसभेतून बाहेर पडले राज्याचे मंत्री – मुख्यमंत्री बघेल यांच्यावर नाराज
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारमधील वाद आता चिघळला आहे. काँग्रेस आमदार बृहस्पति सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी आरोग्यमंत्री टी.एस. सिंह देव (बाबा) आता आरपारच्या भूमिकेत आहेत. या आरोपांप्रकरणी सोमवारी राज्याच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेस आमदाराने टी.एस. सिंह देव यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती टीएस सिंह देव यांनी मंगळवारी सभागृहात स्वतःच्या सरकारच्या विरोधात भूमिका मांडून सभागृहात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
सभागृहात माझ्याप्रकरणी सरकारकडून स्पष्ट वक्तव्य केले जात नाही तोवर सभागृहाच्या कामकाजात सामील होण्यासाठी पात्र नसल्याचे मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टीएस सिंह देव मंगळवारी दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजते. काँग्रेसच्या नेतृत्वाची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सर्व प्रकरण राज्यात मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे विभागून घेण्याच्या कथित निवडणुकीपूर्वीच्या प्रस्तावाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे उलटली असल्याने टीएस सिंह देव मुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्याची चर्चा आहे.
माझी हत्या करवून टीएस सिंह देव मुख्यमंत्री होऊ इच्छित असल्याचा आरोप काँग्रेस आमदार बृहस्पति सिंग यांनी केला आहे. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सोमवारी काँग्रेसचे राज्य प्रभारी पी.एल. पुनिया यांनी रायपूरमध्ये सक्रीय होत नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. आरोपामुळे टीएस सिंह देव मात्र दुखावले गेले आहेत. तर या पूर्ण प्रकरणी राज्य सरकारकडून कुठलेच स्पष्टीकरण आलेले नाही. आरोप लावणारा आमदार भूपेश बघेल यांचा समर्थक आहे.
पुनिया यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेत चर्चा केली होती. तसेच टीएस सिंह देव आणि आमदार बृहस्पति सिंग यांच्यातही चर्चा झाली होती. या भेटीनंतर आता कुठलाच वाद नसल्याचे सोमवारी म्हटले गेले होते. पण मंगळवारी टीएस सिंह देव यांनी आता सरकारला लक्ष्य करणारी भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत राज्य सरकारला पेचात पकडले आहे. आरोप करणारा आमदार काँग्रेसचा तसेच मंत्री देखील काँग्रेसचा असल्याने चौकशीचा निर्णय घेणे मुख्यमंत्र्यांना अवघड ठरले आहे.