ऑनलाईन टीम / रायपुर :
छत्तीसगडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे छत्तीसगड सरकारने राजधानी रायपुर, बिलासपूर आणि दुर्ग यासह अनेक शहरी भागांमध्ये 6 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हॉटस्पॉट भागात लॉक डाऊन 6 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले आहे. हा निर्णय मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी स्थानिक भागात लॉक डाऊन बाबत निर्णय घेतील.
पुढे ते म्हणाले, रायपुर, बिलासपूर आणि दुर्ग यासारख्या मोठ्या शहरात जेथे कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा ठिकाणी लॉक डाऊन चा कालावधी 28 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
ते म्हणाले, या बैठकीत खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत पण चर्चा करण्यात आली. या पिकांसाठी लागणारी पाण्याची आवश्यकता आणि जलाशयातील उपलब्ध पाणी लक्षात घेऊन 28 जुलै पासूनच जलाशयात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.