नंदकुमार बघेल यांना वादग्रस्त टिप्पणी भोवली – 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना पोलिसांनी आग्रा येथून अटक केली आहे. नंदकुमार यांना मंगळवारी रायपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नंदकुमार यांनी जामीन स्वीकारण्यास आणि वकील नियुक्त करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांच्यावर ब्राह्मणांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात रायपूरच्या डीडीनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व ब्राह्मण समाज संघटनेच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंद झाला होता. नंदकुमार यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात भादंविचे कलम 505 (समुदायांमध्ये शत्रुत्व, घृणा किंवा वैमनस्याची भावना निर्माण करणे) आणि कलम 153 अ (सामाजिक तणाव वाढविणारे विधान करणे) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
समुदायाकडून निदर्शने
सुमारे 3 दिवसांपूर्वी नंदकुमार यांचा प्रतिकात्मक पुतळा ब्राह्मण समुदायाने रायगढमध्ये जाळला होता. एफआयआर नोंदविण्याच्या मागणीवरून पोलीस स्थानकाला घेराव घालण्यात आला होता. कित्येक तास चाललेल्या गोंधळानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत कारवाईचे आश्वासन दिले होते.
आक्षेपार्ह विधान
मागील महिन्यात लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना नंदकुमार यांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘अब व्होट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा’ हे आंदोलन करणार आहोत. ब्राह्मणांना गंगेमधून वोल्गामध्ये (रशियातील एक नदी) पाठवू, कारण ते विदेशी आहेत. ज्याप्रकारे इंग्रजांना देशातून निघून जावे लागले, त्याचप्रकारे ब्राह्मणांनी गंगेतून वोल्गामध्ये जाण्यास तयार रहावे असे नंदकुमार म्हणाले होते.
20 वर्षांपूर्वी पुस्तकावरून वाद
नंदकुमार यांनी 20 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक समोर येताच वाद उभा ठाकला होता. 2001 मध्ये छत्तीसगडच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने या पुस्तकावर बंदी घातली होती. बघेल 17 वर्षांपर्यंत या निर्णयाच्या विरोधात न्यायालयीन लढा देत होते. 2017 मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाने बंदीच्या विरोधातील त्यांची याचिका फेटाळली होती. पुस्तकात हिंदू धर्माच्या मान्यतांच्या विरुद्ध तसेच समाजावर नकारात्मक प्रभाव पाडणारा मजकूर असल्याचे सरकारचे म्हणणे होते.