सकल मराठा समाजाची मागणी, कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर दिल्लीत धडक मारण्याचा निर्धार
प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दचा निकाल बुधवारी दिल्यानंतर मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठा युवक-युवतींनाही आपल्या करिअरची चिंता लागली आहे. अनेकांनी त्याबद्दल संतापही व्यक्त केला आहे. या साऱया वातावरणात राज्य सरकारविरोधातही रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज संघटनांकडे तीव्र मराठा युवावर्गातून पुढे काय? अशी विचारणा होत आहे. या साऱया कठिण परिस्थितीत बुधवारी दुपारी सकल मराठा कोल्हापूरच्या पदाधिकाऱयांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना यापुढील आरक्षणाच्या लढाईत नेतृत्व करण्याची विनंती केली. आरक्षणाचा लढा दिल्लीतच लढावा लागणार असल्याने कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर दिल्लीत धडक मारण्याशिवाय पर्याय नाही, त्यावेळी शाहू महाराजांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन प्रभावी ठरणार आहे, असा आशावादही पदाधिकाऱयांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह गुलाबराव घोरपडे, दिलीप देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, उत्तम जाधव, अवधूत पाटील, संदीप देसाई, प्रताप नाईक, इतिहास अभ्यासक इंद्रजित माने, संजय काटकर यांच्यासह पदाधिकाऱयांनी न्यू पॅलेसवर शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी नियोनजासंदर्भात चर्चा केली.
वसंतराव मुळीक म्हणाले, आरक्षण न मिळाल्याने मराठÎांच्या दोन पिढÎा बरबाद झाल्या. आता पुढील पिढी बरबाद होऊ नये, यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी नजीकच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या अख्त्यारीत असणाऱया बाबींच्या पातळीवर पाठपुरावा करावा लागणार आहे. अशा महत्वाच्या काळात सक्षम, सर्वमान्य आणि बिगरराजकीय अशा नेतृत्वाची गरज आहे. श्रीमंत शाहू महाराज यांच्या रूपाने सर्वमान्य नेतृत्व राज्यातील सर्व मराठा समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शन ठरू शकते. त्यामुळे महाराजांनी आरक्षणाच्या लढाईत प्रश्न सुटेपर्यंत नेतृत्व करावे.
दिलीप देसाई यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील लढाई लढावी लागेल, असे सांगितले. इंद्रजित सावंत यांनी सकल मराठा समाजाने तयार केलेली आचारसंहिता सांगितली. आरक्षणाच्या लढाईत राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्यांनी आपले पक्षीय विचार बाजूला ठेवून एकजुटीने लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सवलती द्या
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणखीन सक्षम करा. सारथीसाठी वर्षाला पाचहजार कोटींचा निधी द्या, पाटील विकास महामंडळाकडून देण्यात येणाऱया कर्जाची मर्यादा वाढवा, ओबीसींना शिक्षणात ज्या सवलती आहे, त्याच मराठÎांना द्या, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचे यावेळी इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
मराठा समाजाचे संघटीत होणे आवश्यक ः श्रीमंत शाहू महाराज
आरक्षणाच्या लढाईत यापुढे मराठा समाजाने संघटीत होणे आवश्यक आहे. ही देशव्यापी लढाई आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर लढावे लागणार आहे. त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल. राजकीय लोकांना बाजूला ठेवून चालणार नाही. त्यांचेही सहकार्य महत्वाचे आहे, असे यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितले.