वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
श्री कृष्णप्रिय तुलसी विवाह संघ बेळगावच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने रविवार दि. 21 रोजी तुलसी विवाह साजरा करण्यात येणार आहे.
यावषी कंग्राळी बुद्रुक गावाला हे भाग्य लाभले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये तुलसी विवाह व सामूहिक विवाह होणार आहेत. शनिवार दि. 20 रोजी सायंकाळी 7 वा. हळदीचा कार्यक्रम व दि. 21 रोजी दुपारी 3 वा. विवाहाचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी दुपारी नवरदेवाची वरात निघणार आहे. हळदीदिवशी कृष्णाला हळद लावून घणा व दिवे काढून नवरीला साडय़ा घेऊन वधूच्या घरी जाणार आहे. दुसऱया दिवशी वराची सुरगीसूत करून खांबा रोवून नवरा वाजत गाजत वधूच्या मंडपामध्ये येऊन तेथे हंडा देणे-घेणे, पाहुण्यांच्या गाठीभेटी, चुलता-चुलतीचे पाय धुणे, कान पिळणे, गणेशपूजन हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. यावेळी कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरातील नागरिकांनी आपली मानाची उपस्थिती दर्शवून लग्न सोहळय़ाला शोभा आणण्याची विनंती करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले. चंद्रकांत अष्टेकर यांनी आभार मानले.
विवाहेच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन
श्री कृष्णप्रिय तुलसी विवाह संघाच्यावतीने तुलसी विवाह सोहळय़ाचे औचित्य साधून सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळय़ात सामूहिक विवाहदेखील करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रशांत पवार मोबा. 7019216485 किंवा संघाचे अध्यक्ष रतन मुचंडीकर मोबा. 8277437663 यांच्याशी किंवा उपाध्यक्षा नमिता मुचंडीकर, खजिनदार मेघा कंग्राळकर, सरचिटणीस दीपा चंदगडकर, कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत अष्टेकर, उपाध्यक्ष अनंत पाटील आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.