भागवत संत महाराज यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ एकसंबा
शौर्यतेचे प्रतिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजेंकडे पाहिले जाते. मानवी जीवनाच्या मर्यादे पलिकडे संभाजी महाराजांचा पराक्रम आहे. त्यांचे शौर्य अगणित आहे. हिंदू धर्माच्या संवर्धनात धर्मवीर संभाजीराजेंचे नाव आवर्जुन घेतले जाते. वारकरी संप्रदाय, बारा जोतिर्लिंग, कीर्तन परंपरा केवळ संभाजीराजेंमुळे आजही टिकुन आहे. ज्या वेळेला धर्माची हानी होते. त्यावेळी भगवंत अवतार घेतात. त्याच न्यायाने संभाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले आहे. म्हणूनच संभाजी महाराजांचे धर्मकार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन भागवत संत महाराज यांनी केले.
येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात आयोजित धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास समारोप समारंभात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वढू बुद्रुक येथून आणलेल्या धर्मवीर ज्वालेचे, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर भगवा ध्वज चढविण्यात आला. यावेळी प्रेरणा मंत्र म्हणून मूक पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गावरून मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली.
जवळपास 25 युवकांनी उपवास, एक महिना अनवाणी राहणे, तसेच आवडीच्या पदार्थांचा त्याग करून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास गांभीर्याने पाळला. मासाच्या समारोपप्रसंगी धर्मवीर संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र अग्निकुंडच होते. त्यांच्या बलिदानातून जनतेने स्वाभिमानाने कसे जगायचे? हे शिकविल्याची भावना धारकऱयांनी व्यक्त केली. मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे वढू बुद्रुक येथून आणण्यात आलेल्या धर्मवीर ज्वालेने यज्ञ प्रज्वलित करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज व भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रत्येकांनी यज्ञात तीळ टाकून व प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून धर्मवीर संभाजी महाराजांच्या ज्वालारुपी पवित्र आत्म्यास आदरांजली वाहिली.
यानंतर श्लोक म्हणण्यात आले. प्रज्वलित झालेल्या यज्ञाच्या साक्षीने देव, देश आणि धर्माची प्रतिज्ञा घेण्यात आली. शेवटी ध्येयमंत्र म्हणून सांगता करण्यात आली. यावेळी विशाल पवार, अक्षय शिंदे देसाई, भरत वरूटे, उत्तम काटकर, अजित शितोळे, निलेश जाधव, आदर्श पवार, प्रशांत मगदूम, श्रेयस जाधव, दर्शन पेटकर, प्रतिक पवार, आकाश जाधव, प्रज्वल भावे, मारुती भावे, आदर्श वाळके, राज शितोळे, केदार चिकले, आदर्श वरूटे, अनिकेत सावंत, अनिल गीड्ड, अनिकेत जाधव, शुभम भोपे, आदर्श शिंदे यांच्यासह इतर धारकऱयांना संभाजी महाराजांची प्रतिमा देण्यात आली..